हल्ली ठिकठिकाणी वाय- फाय आणि स्वस्त इंटरनेट पॅकेजमुळे सर्वसामान्यांनाही इंटरनेट परवडू लागले आहे. साहजिकच मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याल्या त्यात प्रवासामध्ये मोबाईलमध्ये गेम खेळणाऱ्यांची संख्या तर सांगायलाच नको. या खेळण्याच्या सवयीमुळेच मोबाईल गेम्स खेळण्याच्या यादीत भारत टॉप ५ मध्ये आला आहे. मोबाईल गेम्स खेळण्यामध्ये भारत पाचव्या क्रमांकावर असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
काय आहे अहवालात?
मोबाईल मार्केटिंग असोसिएशन पॉवर ऑफ मोबाईल गेमिंग इन इंडियाने सादर केलेल्या अहवालानुसार भारतात मोबाईल गेम खेळणाऱ्यांची संख्या २५ कोटींवर पोहोचली आहे. चार पैकी तीन जण दिवसभरात किमान दोनदा तरी गेम खेळतातच. विशेष म्हणजे भारतात मोबाईल गेम खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या आपण पाचव्या स्थानावर आहोत. पण जर असाच आकडा वाढत राहिला तर भारत अव्वल स्थानावर पोहोचण्यास वेळ लागणार नाही.
टीव्हीकडे फिरवली पाठ
मोबाईल गेम्स खेळण्याच्या नादात अनेकांनी टीव्हीकडे पाठ फिरवल्याचे देखील निदर्शनास आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे प्राईम टाईम शोपेक्षा मोबाईल गेम्सना अधिक पसंती मिळत आहे.
PUBG सगळ्यात जास्त लोकप्रिय
सध्या मोबाईल गेम्समध्ये सगळ्यात जास्त क्रेझ आहे ती PUBG या खेळाची. जाना ब्राऊजरने केलेल्या सर्वेक्षणानुसार ६२ हून अधिक टक्के लोकांनी PUBG हा खेळ डाऊनलोड केला आहे. या व्यतिरिक्त पाटणाच्या विकास जैस्वाल यांनी तयार केलेला LUDO KING हा खेळही खेळला जात आहे. या शिवाय पोकेमॉन गो, क्लॅश ऑफ क्लॅन्स, फिफा हे खेळ देखील अधिक खेळला जात आहे.