मोबाईल कंपन्या आपले सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. मात्र, दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायच्या अहवालानुसार ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सलग दुसऱ्या महिन्यात सबस्क्रायबर्सची संख्या घटली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर या काळात ३.१९ कोटी ग्राहक कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर ऑक्टोबर २०१९ मध्ये देशात मोबाईल ग्राहकांची संख्या ९६.६ लाखांनी वाढली होती. या अहवालानुसार दोन महिन्यांत व्होडाफोन-आयडियाचे सर्वाधिक ४ कोटी ६३ हजार ग्राहक कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘आमच्या सेवा पद्धतीत बदल हे ग्राहकांची संख्या कमी होण्यामागचे कारण आहे’, असे म्हटले आहे.
जिओचे सबस्क्रायबर्स वाढले
आपल्या ग्राहकांसाठी कायम विविध ऑफर्स घेऊन येणाऱ्या जिओ कंपनीने देखील आपले सबस्क्रायबर्स वाढावे यासाठी कंपनीच्या वार्षिक सभेत सबस्क्रायबर्स वाढवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यानंतर आता रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या ५६.९१ लाखाने वाढली आहे. तर नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ या काळात सुमारे १.८८ कोटी मोबाइल ग्राहक शहरांतून कमी झाले आहेत. तसेच ग्रामीण भागातील ही संख्या १.३ कोटी इतकी आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागातील ग्राहक २.१ लाखांनी वाढले.
का कमी झाले सब्सक्रायबर्स?
मोबाइल तज्ञ आणि टेकआर्कचे संस्थापक आणि मुख्य विश्लेषक फैसल कोसा यांनी सांगितले की, ‘प्लॅन महागल्याने ग्राहक कमी झाले आहेत. तर काही सरकारी अनिवार्यतेमुळेही लोक एकच सिम ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. तर कंपन्यांनी डिसेंबर अखेरीस सेवा दरांत वाढ केली आहे. त्यामुळे ट्रायच्या जानेवारीतील अहवालात सबस्क्रायबर्सची संख्या आणखी घटू शकते’, असे ते म्हणाले आहेत. तर सीओएआयचे महासंचालक राजन एस. मॅथ्यूज यांनी ‘ग्राहक घटण्यामागे जागतिक तसेच देशांतर्गत अनेक कारणे आहेत’, असे सांगितले आहे.