घरठाणेशेतकर्‍यांचे उत्पन्न वाढीसाठी आराखडा तयार करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढीसाठी आराखडा तयार करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

Subscribe

जिल्ह्यात भात वरी पिकांबरोबरच सोनचाफा, हळदी, भेंडी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करावे. शेतकर्‍यांचे सरासरी उत्पन्न वाढावे, यासाठी आराखडा तयार करावा. तसेच खरीप हंगामात खते, बियाणे, पिककर्ज पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी येथे दिले. याचदरम्यान त्यांनी एक रुपयात पिक विमा या योजनेपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. असेही सांगितले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात सोनचाफा फुलाचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश दिले आहे. त्याप्रमाणे हे क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा कृषि विभागाने आराखडा तयार करावा. असे म्हटले आहे.

पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. आमदार किसन कथोरे हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी सारिका शेलार, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस उपस्थित होते.
जिल्हा कृषि विभागाने केलेल्या खरीप हंगामा 2023 च्या नियोजनाचा आढावा घेऊन पालकमंत्री देसाई म्हणाले की, जिल्ह्यातील लागवडी योग्य क्षेत्र दुप्पटीने वाढविण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांना कृषि पतपुरवठा मिळावा, याकडेही लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील भाजीपाला तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना शहरी भागात मोक्याच्या जागी तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध मॉलमध्ये जागा मिळावी, यासाठी आराखडा तयार करावा. महानगरपालिकांच्या क्षेत्रात महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांची बैठक घेऊन सूचना देऊ, असेही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात आंबा पिकाऐवजी फणस, काजू, हळद या पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच शेतकर्‍यांचा भाजीपाला विक्रीसाठी शहरी भागात जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना ताजा भाजीपाला मिळेल व शेतकर्‍यांच्या मालाला रास्त किमतही मिळेल. असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. आमदार मोरे यांनीही नागली, वरई व बांधावरील तूरच्या उत्पादनावर भर देण्याची सूचना केली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितले की, जिल्ह्यात भात व नागली या पिकांबरोबरच हळद, सोनचाफा फुलांच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. तसेच भात पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यावर कृषि विभाग भर देत आहे. 2022 मध्ये भात उत्पादकतेमध्ये सरासरी 23 टक्के वाढ झाली आहे. यंदा सन 2023-24मध्ये एकूण 56 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरणीचे लक्षांक ठेवले असून 2700 किलो प्रति हेक्टर उत्पादनाचे लक्ष ठेवले आहे. तर जिल्ह्यात नाचणी पिकाची सरासरी उत्पादकता 949 किलो प्रति हेक्टर एवढी असून खरीप हंगाम 2022 मध्ये 1138.12 किलो प्रति हेक्टर उत्पादकता होती. सन 2023-24 मध्ये एकूण 3542 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे, असेही शिनगारे यांनी सांगितले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुटे यांनी खरीप हंगामासाठी सुमारे 12 हजार क्विंटल बियाणांची मागणी केली असून त्याप्रमाणे पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 842 हेक्टर क्षेत्रावर संकरित बियाणाचा वापराचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे खते व बियाणांचे पुरवठा करण्यात येणार असल्याचे कुटे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -