घरठाणेहवेतील प्रदुषणावर नियंत्रण हवे

हवेतील प्रदुषणावर नियंत्रण हवे

Subscribe

महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन न केल्यास कारवाई

हवेतील प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी केले. धूळ प्रतिबंधक उपाययोजना तात्काळ अंमलात आणणेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या बैठकीतील उपस्थितांना दुरदृश्य प्रणालीद्वारे संबोधिताना त्यांनी हे प्रतिपादन केले. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे आणि इतर अधिकारी वर्ग, पोलीस अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक अधिकारी,आरटीओचे अधिकारी, एमसीएचआयचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिकेने सर्व प्रभागांतर्गत धूळ नियंत्रण उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी प्रभागनिहाय पथकाची स्थापना केल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी या बैठकीत दिली. या पथकामध्ये बांधकाम विभागाचे उपअभियंता पथकप्रमुख राहणार असून, त्यामध्ये अनधिकृत बांधकाम विभागाचे अधिक्षक, स्वच्छता अधिकारी आणि संबंधित विभागाकरीता नियुक्त असलेले नगररचना विभागाचे सर्व्हेअर यांचा अंतर्भाव राहिल.

अंमलबजावणी पथक परिसराला भेट देवून व्हिडीओग्राफी करेल आणि संबंधित ठिकाणी नियमातील तरतुदीचे पालन करीत नसल्यास, काम थांबविण्याची नोटीस देईल किंवा कार्यस्थळ तात्काळ सील करण्याची कारवाई करेल.
सत्तर मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवत किमान 35 फुट उंच कथील, धातूचे पत्रे उभारले जातील याची सर्व प्रकल्प विकासकांनी, ठेकेदारांनी खात्री करावी. बांधकामाधीन सर्व इमारतींना हिरव्या कापडाने, ज्युट शीटने, ताडपत्रीने चारही बाजूंनी बंदिस्त करावे. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग करताना दरम्यान वॉटर फॉगिंग केले जाईल याची खात्री करावी. बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायु प्रदुषण मॉनिटर्स बसविण्यात यावेत. सर्व बांधकामाच्या ठिकाणी वायूप्रदुषण पातळी नियंत्रीत राखण्यासाठी प्रयत्नशील राहिल याची काळजी घ्यावी. अशा सूचना अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी या बैठकीत उपस्थितांना दिल्या.

- Advertisement -

फटाके फोडण्यासाठी ७ ते रात्री १० ची वेळ
हवेतील प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका क्षेत्रातील फटाक्यांची आतषबाजी सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत करावी, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. महापालिका क्षेत्रात विशेषत: कचरा डंपिंग ग्राउंड वा उघड्यावर कोठेही कचरा जाळण्यास पूर्ण बंदी असेल वा या बंदीचे उल्लंघन केल्यास कायद्याप्रमाणे दंड केला जाईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची संपू्र्ण जबाबदारी ही संबंधित प्रभागाचे सहा. आयुक्तांची राहणार असून, त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांची मदत घेवून धूळ प्रतिबंधक उपाययोजना परिणामकारकरित्या राबवावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल उपायुक्त पर्यावरण, कार्यकारी अभियंता पर्यावरण यांचेकडे सादर करावा, असा आदेश महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिला आहे.

उल्हासनगर शहर प्रदुषणाच्या विळख्यात
उल्हासनगर शहरामध्ये प्रदुषणात वाढ झाल्याने शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. मुंबईपेक्षा अधिक प्रदुषण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. शहराच्या चारही बाजुने भंगार विक्रेत्यांच्या भंगार जाळपोळी मुळे शहराचा धुराळा झाला आहे. या बाबत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला खडे बोल सुनावले आहेत.
उल्हासनगर हे दाटीवाटीचे शहर आहे. शहराच्या चारही बाजुला भंगार विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील रस्ते धुळीने माखले आहेत. उल्हासनगर कँप 3 येथील साई धरम पॅलेस समोर भंगाराची मोठी दुकाने आहेत. बाजुलाच प्लास्टिकचे कारखाने आहेत. दरम्यान वालधुनीच्या काठावरही भंगार विक्रेते आहेत. हे भंगारविक्रेते सकाळी भंगार जाळण्याचे काम करतात. त्यामुळे प्रदुषणात वाढ झाली आहे. संजय गांधी नगरपासून ते शांतीनगरपर्यंत भंगाराची दुकाने आहेत. हे भंगारवाले निकामी असलेले भंगार नदीत टाकून देत असल्याचे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता एकदम ढासळली आहे. दरम्यान मुंबईच्या हवेची गुणवता 170 असून उल्हासनगरातील हवेची गुणवत्ता ही 200 पेक्षा अधिक झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. शहर पातळीवर हवेची गुणवत्ता चांगली राखण्यास महापालिका अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला चांगलेच खडसावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -