घरठाणेभिवंडी ठाणे महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी

भिवंडी ठाणे महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी

Subscribe

त्रासलेल्या ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

भिवंडी-ठाणे महामार्गावर सध्या एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे -भिवंडी कल्याण असे मेट्रोचे काम सुरु आहे. मात्र या मेट्रोच्या कामात कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीबाबत स्थानिक नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत. मात्र वाहतूक पोलीस प्रशासनासह या मार्गावर टोल वसुली करणार्‍या कंपनीचे आणि एमएमआरडीए प्राधिकरणाचे एकसूत्रीपणा नसल्याने या मार्गावर रोज वाहतूक कोंडी होत आहे. अनेक विनंत्या अर्ज करूनही या वाहतूक कोंडीवर संबंधित विभागाने कोणताही पर्याय शोधला नाही.

ग्रामस्थांनी या प्रश्नाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. येत्या दहा दिवसात या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढला नाही तर स्थानिक महिला आणि नागरिकांसह कशेळी टोल नाका येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. परिसरातील पाच गावातील ग्रामस्थांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. ठाणे-भिवंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर गोदाम पट्टा असल्याने या भागात वाहनांची नेहमी ये-जा असते. त्यातच भिवंडीतील कानाकोपर्‍यातून नागरिक रोजगारासाठी या मार्गावरून रोज प्रवास करत असतात. त्यातच आता कोरोना संकट काही प्रमाणात आटोक्यात आल्याने मुलांच्या शाळा देखील सुरु आहेत. या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यातच लॉक डाऊन नंतर आता सर्व व्यवस्थापन सुरु झाल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. रस्त्याच्या मध्यभागी एमएमआरडीए प्राधिकरणाने मेट्रो ट्रेनचे काम हाती घेतल. मात्र हे काम करण्या आधी या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविणे गरजेचे असतानाची त्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.

- Advertisement -

या वाहतूक कोंडीने कशेळी, काल्हेर, पूर्णा, राहणाल येथे रोजगारासाठी जाणार्‍या कामगारांना तसेच भिवंडी ठाणे प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. मात्र रस्त्यावरील अतिक्रमणे अजूनही हटविली नाहीत. तसेच रस्त्यावर स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिक आपली वाहने पार्क करून ठेवतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.

काल्हेर ते राहनाळ या भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठें खड्डे पडले आहेत. त्याच बरोबर कोपर ते राहनाळ या भागात रस्त्यावर टोल कंपनीने कोणतेही गटार व्यवस्थापन केले नसल्याने गटाराचे पाणी मुख्य महामार्गावर येते. या मार्गात चिखल मिश्रित गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. तर या चिखल मिश्रित पाण्यात दुचाकी स्वार घसरून पडल्याने अपघात होतात. येत्या दहा दिवसात या वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका केली नाही तर वंचितच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा
ग्रामस्थांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -