माणसाच्या आयुष्यात आणि समाजात उत्साह निर्माण करणारा तसेच कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा होणार्या होळी आणि त्यानंतर धुलीवंदनाच्या उत्साहात पाणी टंचाईमुळे रंगाचा बेरंग होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पाणीटंचाई नैसर्गिक आहे. तर काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे निर्माण झाली आहे. कल्याण तालुक्यात चार बारमाही वाहणार्या नद्या आहेत, उल्हास, बारवी, भातसा आणि काळू, यातील उल्हास नदीवर एकमेव रायता प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. तर बर्याच ग्रामपंचायतीच्या स्वतः च्या स्वंतत्र पाणी पुरवठा योजना आहेत. असे असूनही अनेक कारणांमुळे तालुक्यातील अनेक गावात, वाड्यावस्त्या वर जानेवारी, फेब्रुवारी पासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे.
नालिबी ठाकूरपाडा, जिभवणीवाडी, खडवली, गेरसे, दानबाव, काकडपाडा, वावेघर, ठाकूरपाडा, आदी तालुक्यातील गाव आणि वाड्यावस्त्यांवर संभाव्य पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. याशिवाय शहापूर तालुक्याती 228 गावे व 437 पाडे असे 665 गावे टंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. सध्या दोन गावांतील 6पाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यांना टँकरने पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. हीच परिस्थिती मुरबाड आणि भिवंडी तालुक्याची आहे. ही नैसर्गिक पाणी टंचाई असली तरी कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळ पाडा ते कांबा पाचवामैल या दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी लाईन फुटल्या, नादुरुस्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून वरप गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच इतर ठिकाणी लाईटबील न भरल्याने किंवा मोटार पंप जळाल्याने पाणी बंद झाले आहे. नदी काठच्या गावातील महिला, पुरुष कसेबसे डोक्यारुन, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी आणत आहे. परंतु आदिवासी वाड्यापाड्यात भयानक परिस्थिती आहे. पाण्यासाठी कित्येक किलोमीटर अंतर वणवण
भटकावे लागत आहे. सरकारचे कोटींच्या जलजीवनच्या योजनांची घोषणा केली, निधीची तरतूद ही केली. परंतु कामाचा ठेका देण्याघेण्यावरुन अनेक गावात वाद सुरू होऊन योजना रखडल्या आहेत.