ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी नव्या रुग्णांच्या संख्येबरोबर दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज ६ हजार १७६ रुग्णांची नोंद झाली असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या आकड्यावरून जिल्ह्यात आता ३ लाख ६७ हजार ६१० रुग्णांची नोंद झाली. तर मृतांची संख्या ६ हजार ६६४ झाली आहे. केडीएमसीत सर्वाधिक दोन हजार १९ नवीन रुग्ण आढळून आले असून ठाण्यात सर्वात जास्त ६ रुग्ण दगावल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठाणे शहर परिसरात १ हजार ८२५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ९२ हजार ५६२ झाली आहे. शहरात ६ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ४९३ झाली आहे. पाठोपाठ कल्याण – डोंबिवलीतही संख्या वाढतेच असून याठिकाणी २ हजार ०१९ रुग्णांची वाढ झाली असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत १ हजार ०३३ रुग्णांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये २५५ रुग्ण सापडले आहेत भिवंडीत ९५ बाधीतांची नोंद झाली असून तिघे दगावले आहेत. मीरा भाईंदरमध्ये ३९७ रुग्ण आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये २२२ रुग्ण आढळले असून एकाच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १९० रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १४० नवे रुग्ण वाढले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.