मुंबईसह ठाणे जिल्ह्याचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने पद्धतीने दर्याला नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमेचा सण मोठया जल्लोषात साजरा केला. ठाणे पूर्व भागात चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कोळीवाड्यातील तिघा नवदाम्पत्याने विधिवत पूजा करत दर्याला नारळ अर्पण करत सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी आवाहन केले. नारळीपौर्णिमेचे औचित्य साधून चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचच्या वतीने पूर्व – पश्चिम कोळीवाड्यातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. पूर्व भागातील विठ्ठल मंदिरात कौत्यय आणि रेश्मा कोळी, कुणाल आणि माधवी कोळी, सम्राट आणि तन्वी कोळी या नवदाम्पत्याच्या हस्ते नारळाची पूजा करण्यात आली. त्यानंतर पश्चिम कोळीवाड्यातील दत्तमंदिरातून ही मिरवणूक वाजत गाजत पूर्व भागातील चेंदणी बंदर येथे आली. त्याठिकाणी दर्याला शांत होण्याचे आवाहन करत त्याला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक विक्रांत कोळी म्हणाले, नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा मोठा सण आहे. पूर्वीपासून चेंदणी कोळीवाड्यात हा सण उत्साहात साजरा होतोय. मधल्या काही काळानंतर चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच च्या वतीने गेल्या २४ वर्षाहून अधिक काळ हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करत समाजाची परंपरा जोपासली जातेय. यावेळी हजारो कोळी बांधव , भगिनी पारंपरिक वेशभूषेत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ठामपाकडून ही मानाच्या नारळाचे पूजन
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधवांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीचे स्मरण करून व मानाच्या नारळाची पूजा करून वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर कळवा खाडी येथे मानाचा नारळ कोळी बांधवांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माजी उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते.