भंडार्ली येथील कचरा प्रकल्प बंद करुन १ सप्टेंबर पासून डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे महापालिकेने नियोजन केले होते. मात्र भांडर्ली प्रमाणे डायघर येथील स्थानिकांनी या प्रकल्पाविरोधात निशाण फडकवले असून १ सप्टेंबर रोजीपासून साखळी उपोषण करणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सावध पाऊले टाकण्याचा निर्णय घेत, या प्रकल्पाचा मुहूर्त लांबणीवर टाकला आहे. त्यातच, येत्या १५ सप्टेंबर पासून येथे कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
ठाणे शहरात आजच्या घडीला सुमारे १ हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होत आहे. यामध्ये ५१५ मेट्रीक टन ओला कचरा, ४४१ मेट्रीक टन सुखा कचरा आणि १२५ मेट्रीक टन सीएनडी वेस्टचा कचरा (डेब्रीज) आहे. दरम्यान डायघर प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी पालिका प्रशासनाचे गेल्या १४ वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प पालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बांधणी, वृक्ष लागवड आणि संरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. येथील रहिवाशांसाठी असलेला रस्ता, प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मशिनचे सादरीकरण झाले आहे. आॅस्ट्रेलिया आणि जर्मनीतून या मशिन येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. आता त्या मशीन देखील देखील डम्पींगच्या जागी आल्याचा दावा करण्यात आला आहे.
परंतु दुसरीकडे भंडार्ली कचरा प्रकल्प बंद करुन १ सप्टेंबर पासून टप्याटप्याने महापालिका डायघर येथे कचरा टाकण्यास सुरवात करणार होती. पालिकेतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने यासाठी आणखी ८ ते १० दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर पासून कचरा डायघरला टाकला जाणार असून त्याठिकाणी पहिल्या टप्यात कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. असे असले तरी स्थानिकांची मनधरणी करण्यात पालिकेला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे येथील रहिवाशांनी १ सप्टेंबर पासून साखळी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. भांडर्लीप्रमाणे डायघर येथील स्थानिकांची मनधरणी करण्यात महापालिका प्रशासन यश येते का हेच पाहावे लागणार आहे.