गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भिवंडीत म्हाडा (MHADA) २० हजार घरं बांधणार असल्याची घोषणा केली. आव्हाड यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. आव्हाड यांनी शुक्रवारी उशिरा भिवंडी महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख यांसह अधिकारी, पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.
जितेंद्र आव्हाड यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात म्हाडाची घरं आहेत. भिवंडी पालिका प्रशासनानं भूखंड उपलब्ध करुन दिल्यास ठाण्याच्या धरतीवर भिवंडीतही म्हाडा २० हजार घरांची उभारणी करेल, असं म्हटलं होतं. दरम्यान, आज आव्हाड यांनी ट्विट करत भिवंडीत २० हजार घरं बांधणार असल्याची माहिती दिली.
#भिवंडी मध्ये #MHADA बांधणार 20000 परवडणारी घर
भिवंडी महानगर पालिका कडून घेणार 25 एकर जमीन— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 4, 2021
मृत व्यक्तिच्या नातेवाईकाला ५ लाखांची आर्थिक मदत
भिवंडी महापालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने धोकादायक आणि अनधिकृत इमारती आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी शहरातील आजमी नगर भागात एक अनधिकृत इमारत कोसळून त्यात एकाचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी दुर्घटनेत बळी गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. तर जखमींना ५० हजार रुपये मदत आणि त्यांच्यावरील उपचाराचा खर्च महापालिका प्रशासन करेल, असं जाहीर केलं.