अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर खासदार शरद पवार यांच्याबाबत शेअर केलेल्या पोस्टवरून वाद सुरू झाला आहे. केतकी विरोधात ठाणे आणि पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तीच्या अटकेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीवर टीका केली आहे.
केतकी चितळेने ज्यापद्धतीने टीका केली, त्यातून तीच्या मनातील विकृती बाहेर आली आहे. तिच्यावर राज्यातील सर्व स्थरातून टीका केली जात आहे. आमच्या भगिनींनी (केतकी चितळे) जे लिहले आहे, ते अत्यंत घाणेरडे आहे. शरद पवार हे मनाने खुप मोठे आहेत. मी जर पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर आता ज्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहे, असा व्यक्त झालो नसतो, असे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मी मर्यादा पाळतो आहे. मात्र, कार्यकर्त्यांचे असे नसते. तुम्ही खालच्या पातळीवरील टीका केल्यामुळे कार्यकर्त्यांचे मस्तक भडकू शकते. कार्यकर्ता वेडा असतो. कार्यकर्त्यांचे शरद पवारांवर आई-बापासारखे प्रेम आहे. तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही. मी कोणाला पाय लावून देणार नाही आणि पाय लावला तर सहन करून देणार नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आम्ही राजकीय टीकेवर सडेतोड उत्तर देतो. अशा प्रकारच्या लढाईत मजा येते. ही एक वैचारिक लढाई आहे. शरद पवार ब्राम्हणांच्या विरोधात वैगेरे काही नाहीत. ब्राह्मणवाद हा मनुस्मृती मधून जन्माला आल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.