घरठाणेकल्याण-डोंबिवली महापालिकेचा घनकचरा प्रकल्प पथदर्शी; गोवा सरकारही माहितीसाठी संपर्कात

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा घनकचरा प्रकल्प पथदर्शी; गोवा सरकारही माहितीसाठी संपर्कात

Subscribe

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कचरा व्यवस्थापन इतर अनेक महापालिकांना, शहरांना आणि राज्यांनाही पथदर्शी ठरत आहे. या प्रकल्पाची दखल देशपातळीवर घेतली जात असून असा प्रकल्प राबवण्याची इच्छा असलेले गोवा सरकार महापालिकेच्या संपर्कात आहे.

कल्याणमधील बहुचर्चित आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आल्याने अनेक वर्षांपासूनची येथे कचरा टाकणे बंद करण्याची नागरिकांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात प्रशासनाला यश आल्याने कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाची स्तुती देशभर होत आहे. या घनकचरा प्रकल्पाचे सर्व श्रेय उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या दुरदृष्टीला आणि आयुक्त डॅा. विजय सूर्यवंशी यांच्या निर्णय क्षमता व अंमलबजावणीला दिले जात आहे. या सर्व गोष्टींमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कचरा व्यवस्थापन इतर अनेक महापालिकांना, शहरांना आणि राज्यांनाही पथदर्शी ठरत आहे. या प्रकल्पाची दखल देशपातळीवर घेतली जात असून असा प्रकल्प राबवण्याची इच्छा असलेले गोवा सरकार महापालिकेच्या संपर्कात आहे.

आगामी काळात महापालिकेचा हा प्रकल्प देशात अग्रेसर ठरुन मार्गदर्शनाचे काम करेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.महापालिकेची स्थापना १९८३ साली झाली. तेव्हापासून महापालिका हद्दीतील ५७० मेट्रिक टन कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात होता. त्याचे वर्गीकरण व त्यावर प्रक्रिया केली जात नव्हती. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड आजाराचे आगार बनले होते. येथील कचऱ्याच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास होत होता. याशिवाय कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळेही आधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी न्यायालयात याचिका केली होती. हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडेही गेले होते. त्या ठिकाणीही हे प्रकरण प्रलंबित आहे. आधारवाडी बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मागच्या वर्षी पदभार स्वीकारताच मे २०२० मध्ये आधारवाडी बंद करण्याचे आव्हान स्वीकारले होते. मात्र कोरोनामुळे त्यांचे शब्द एक वर्षानंतर ते खरे करू शकले. मे २०२० पासून महापालिकेने शून्य कचरा मोहीम राबवली व कचरा वर्गीकरण सुरू केले.

- Advertisement -

त्यामुळे एक वर्षाने आधारवाडी बंद करण्यात प्रशासनाला यश आले.महापालिका २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया उंबर्डे घनकचरा प्रकल्पात करणार आहे, तर १०० मेट्रिक टन कचऱ्यावर बारावे प्रकल्पात प्रक्रिया करणार आहे. ५० टक्के ओल्या कचऱ्यावर महापालिकेने उभारलेल्या आयरे, उंबर्डे, कचोरे, बारावे येथील पाच बायोगॅस प्रकल्पात प्रक्रिया केली जात आहे. तसेच महापालिकेतील काही बड्या गृह संकुलातील ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहे. सध्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर असलेला कचरा हा बायो मायनिंग पद्धतीने नष्ट केला जाणार आहे. त्यानंतर हा कचरा भिवंडी येथील एका गावाच्या दगडखाणीत नेऊन टाकला जाणार आहे.

हा प्रकल्प १३७ कोटी रुपये खर्चाचा असून त्याला सरकारने मान्यता दिली आहे. तज्ज्ञ समितीच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल.महापालिकेने उंबर्डे येथे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभारला आहे. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून इंधन तयार करणे, कचऱ्यापासून खत तयार करणे, कापडी कचऱ्यापासून पिशव्या तयार करणे इत्यादी उपक्रम राबवण्यात येत आहेत. कर्जत कचराभूमीच्या धर्तीवर आधारवाडी डम्पींग ग्राउंड हटल्यानतंर भव्य गार्डन, सायकल ट्रॅक, खाडी किनारा सुशोभिवंत केला जाणार आहे. एकेकाळी दुर्गंधीचे साम्राज्य बनलेल्या भुमीला यातून सुटका मिळून ती लवकरच सुशोभीत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -