घरठाणेसावित्रीबाईंचे विचार लक्षात घेवून विवेकवादाच्या आधारावर वाटचाल केल्यास निश्चितच बळ मिळेल- प्रा. हरी...

सावित्रीबाईंचे विचार लक्षात घेवून विवेकवादाच्या आधारावर वाटचाल केल्यास निश्चितच बळ मिळेल- प्रा. हरी नरके

Subscribe

सावित्रीबाई फुले यांचे विचार आज जसेच्या तसे लागू होतील असे नाही, काळ बदललेला आहे, आव्हाने बदललेली आहेत, प्रश्न बदललेले आहेत.  काळ हा गुंतागुंतीचा आहे त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे आपली आपल्यालाच शोधावी लागतील. पण आज सावित्रीबाई आणि ज्योतीराव फुले असते तर त्यांनी कशी उत्तरे शोधली असती याचा विचार करुन आजच्या स्त्रियांनी  समतोल भूमिका घेत विवेकवादाच्या आधारावर वाटचाल केली  तर त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी निश्चिचत अधिक बळ मिळेल व त्यांना आपल्या संपन्न विचारांचा वारसा पुढे नेता येईल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक प्राध्यापक हरी नरके यांनी नुकतेच ठाण्यात  केले. जागतिक महिला दिन आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाचे  औचित्य साधून ठाणे महापालिकेतर्फे आयोजित व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प शुक्रवारी गडकरी रंगायतन येथे प्रा. हरी नरके यांनी गुंफले.  ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. या कार्यक्रमास ठाण्यातील ज्येष्ठ लेखिका अनुपमा उजगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्राध्यापक हरी नरके यांनी ‘सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्री’ या विषयावर विवेचन केले. ते म्हणाले की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा संपूर्ण संघर्ष हा सामान्य माणसाला संधी मिळाली पाहिजे, सामान्य माणसांमध्ये सुद्धा प्रतिभा असते, हे सांगणारा होता. आज जेव्हा विदर्भातील कुणब्याचा मुलगा असणारे विजय भटकर यांनी संगणकाची निर्मिती केली सत्यनारायण गंगाराम पित्रोदा म्हणजे सॅम पित्रोदा या भाड्यांचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील मुलानी मोबाईलच्या निर्मितीमध्ये झेप घेतली. जयंत नारळीकर,  रघुनाथ माशेलकर अशी कितीतरी सामान्य कुटुंबातील माणसे यांनी जे काम केले त्यातून देशाची प्रगती झाली देश अमुलाग्र बदल करू शकला आणि यामागे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचाच विचार आहे.  संधी मिळाली पाहिजे हा त्यांचा जो विचार होता त्याचे आज दृश्य परिणाम दिसत असून सामान्य कुटुंबातील अशी असंख्य माणसं आज नवनव्या संधीचा फायदा घेऊन देशाच्या प्रगतीमध्ये  सहभागी होत आहेत.

- Advertisement -

दुसरा महत्त्वाचा मुद्दा मांडताना प्राध्यापक हरी नरके म्हणाले की मुलींना संधी मिळाली पाहिजे मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे विज्ञान पर्यावरण निर्मिती या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीला स्थान असलं पाहिजे ते बरोबरीच असले पाहिजे यासाठी सुद्धा सावित्रीबाईंच्या संघर्ष होता आणि आज या संपूर्ण क्षेत्रामध्ये स्त्रीने पुरुषा बरोबरीने आपली भागीदारी नोंदवली आहे आपला सहभाग नोंदवते आहे यातूनच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जो लढा उभारला त्या लढ्याला यश येताना दिसते आहे असेही त्यांनी नमूद केले.

अहिल्याबाई होळकर, रमाबाई रानडे आणि सावित्रीबाई फुलेंना संधी देणारे त्यांचे पतीच होते, त्यामुळे पुरूष बदलत नाहीत, ते दुष्ट असतात, असे नाही, स्त्री हक्कांची चळवळ ही पुरूषविरोधी चळवळ नसून पुरूषांच्या अंहकार आणि वर्चस्वाच्या विरोधात आहे, असे प्रा. नरके यांनी स्पष्ट केले. आजही ५३ टक्के स्त्रिया या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात, त्यात ७० टक्के स्त्रिया महानगरातल्या आहे, या वास्तवाकडेही त्यांनी लक्ष वेधले. ज्या देशात स्त्रियांची प्रगती होते, त्या देशाची प्रगती होते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. घटनेने दिलेल्या हक्कांमुळे स्त्रीया सर्व क्षेत्रात प्रगती करत आहेत, मात्र संसदेत अजूनही त्यांच्या समान प्रतिनिधित्वाचे विधेयक प्रलंबित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.  मात्र पंचायत राज विधेयकामुळे मोठ्या प्रमाणात स्त्र‍ीया सत्तेत येत असल्याने पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यात सकारात्मक बदल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भिडेवाड्यातील शाळेचे स्मारकाबद्दल शासनाचे आभार
महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात जी पहिली शाळा सुरू केली, त्या भिडेवाड्याचे स्मारक करण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केलेली असल्याबद्दल प्रा. हरी नरके यांनी  शासनाचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -