कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीचे रेल्वे तिकीट खिडकीजवळ उभी असताना अज्ञातांनी अपहरण केले आहे. या मुलीचा कल्याण रेल्वे स्थानक परिसर, नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती आढळून न आल्याने कुटुंबियांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, शनिवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान एक प्रवासी आपल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह बाहेरगावी प्रवासाला जाण्यासाठी आला होता. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील रेल्वे तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी जाण्यापूर्वी प्रवाशाने जवळील पिशव्या आणि आपल्या मुलीला पिशवी जवळ उभे राहण्यास सांगितले, मुलीचे वडील तिकीट काढण्यासाठी गेले.
तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची रांग होती. त्यामुळे त्यांना परत येण्यास उशीर झाला. तिकीट काढून आल्यानंतर मुलीच्या वडिलांना सामानाच्या पिशव्यांजवळ मुलगी आढळून आली नाही. त्यांनी तात्काळ परिसरात शोध घेतला. त्यांना ती कोठेच आढळून आली नाही. कुटुंबीय, नातेवाईकांना विचारणा केली. तेथेही ती आढळून न आल्याने मुलीला फूस लावून कोणी तरी पळवून नेले असल्याचा संशय व्यक्त करून कुटुंबीयांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.