घरठाणेमाळशेज घाट बनत आहे मृत्यूचा सापळा

माळशेज घाट बनत आहे मृत्यूचा सापळा

Subscribe

अपघाताला आमंत्रण

कल्याण-नगर महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला माळशेज घाट हा अनेक अडचणीमुळे जणू मृत्यूचा घाट बनला आहे. अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, खोल दरी यातून वाट काढत रोज लाखो प्रवाशांना आपल्या जीवावर उदार होऊन गाड्या चालवाव्या लागतात. अनेक ठिकाणी संरक्षण भिंती नसल्याने कोणत्याही क्षणी वाहने खोल दरीत कोसळण्याचा धोका असून, दिशादर्शक फलक देखील गायब  आहेत. त्यातच रस्त्या लगत झाडे झुडपे, गवत वाढल्याने अपघातास कराणीभूत ठरत आहेत.
तालुक्यातील सावर्णे ते माळशेज घाटाच्या कामांची अवस्था पाहिली तर रस्ता व त्यावरील  कामाची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याने धोकादायक कठड्याच्या खालीच जागोजागी  रस्ते खड्ड्यात शोधीत पाण्यापावसात, दाट धुक्यात, वाट शोधावी लागते. रस्त्यालगतचा पांढरापट्टा हा एकमेव आधार ठरतो. रात्रीच्या प्रवासाला या रस्त्याच्या या साईड पट्टयावर पाहत अंदाज घेत वाहन चालक कसरत करतात. या घाटाच्या सुशोभिकरण ते दुरुस्तीसाठी  गेल्या दहा वर्षात कोट्यवधींच्या निधीवर चार ठेकेदार मालामाल झाले. मात्र रस्त्याच ग्रहण काही सुटत नाही. नको त्या ठिकाणी जाळ्या लावण्यात येऊन खरोखरच रस्त्यावरील अनेक धोकादायक सुळके पुढच्या वर्षाला काम काढण्याच्या उद्देशाने राखीव ठेवले आहेत की काय, असे अनेक प्रवाशी जातांना कुजबुज करतात.  कोट्यवधींंच्या निधीत किमान रस्तातरी सिमेन्ट काॅंक्रिट करायला हवा. राज्यातील नॅशनल हायवे हे चौपदरीकरण होऊन  सिमेन्ट क्राॅंक्रीटचे रस्ते झाले आहेत. मात्र एकमेव या माळशेजघाटाचे ग्रहण काही सुटत नाही. २ जानेवारी २०१४ ला याच घाटात विठ्ठलवाडी भगवानगड बस कठडा तोडून दरीत कोसळून  ३२ प्रवाशांचे बळी गेले होते.
माळशेज घाटातून रोज असंख्य वाहने ये-जा करत असतात. सावरनेपासून एमटीडीसीपर्यंतचा हा १२ किलोमीटरचा प्रवास त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.   माळशेज घाटात सहा ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या असून अद्याप त्याची डागडुजी झालेली नाही. जेथे संरक्षण भिंती बांधण्याची गरज आहे तिथे या भिंती बांधल्या जात  नाहीत, धोकादायक वळणांवर ठेकेदार संरक्षण भिंती बांधायला सहजासहजी तयार होत नाहीत, कारण एका बाजूला खोल दरी आणि धोकादायक वळण यामुळे ज्यादा मनुष्यबळ तसेच अधिक बांधकाम साहित्य लागणार आहे. त्यावर पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे, त्यामुळे ठेकेदार त्यापासून पळ काढतात.

धोक्याच्या फलक सूचना नाहीत
माळशेज घाटातील १२ किलोमीटरच्या मार्गावर कुठेही दिशादर्शक तसेच सूचना देणारे फलक दिसत नाहीत. वाहने हळू चालवा, पुढे धोकादायक वळण आहे, दरड कोसळण्याचा धोका, अशा सूचना देणारे फलक अन्य घाटामध्ये आढळून येतात, मात्र माळशेज घाटात हे फलकच नसल्याने वाहनाचालकांना राम भरोसे गाड्या चालवाव्या लागवतात.

वर्षभरात १२७ अपघात
माळशेज घाटात वर्षभरात सुमारे १२७ अपघात झाले आहेत. २ जानेवारी २०१४ रोजी झालेल्या बस अपघातात ३२ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यावेळी कोसळली संरक्षण भिंत अद्याप दुरुस्त केलेली नाही. माळशेज घाट हा वाहन चालकांना कायम मृत्यूचा सापळा बनला आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -