मध्य रेल्वेच्या (लोअर ) कोपर रेल्वे स्थानकातील आणि दिवा-वसई मार्गावरील (अप्पर ) कोपर रेल्वे स्थानकाला जोडणारा नवीन पादचारी पुल मध्य रेल्वे प्रशासनाने अखेर नुकताच खुला केला आहे. कोणताही गाजावाजा न करता तसेच नेत्या-पुढार्यांच्या हस्ते होणार्या उद्घाटन समारंभ न करता हा पुल प्रवाशांसाठी खुला केल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, शहापूर भागातून रेल्वेने येणारा व पश्चिम रेल्वेच्या वसई, विरार, डहाणू, पालघर, बोईसर, आदी भागात नोकरी, व्यवसायासाठी जाणारा बहुतांशी चाकरमानी नोकरदार वर्ग गाडी बदलण्यासाठी मध्य रेल्वेच्या जमिनीलगतच्या (लोअर ) कोपर रेल्वे स्थानकात उतरतो. त्यानंतर हा प्रवासी तेथून (अप्पर ) कोपर रेल्वे स्थानकात पनवेल वा दिवा रेल्वे स्थानकातून येणार्या शटल सेवेने वसई, विरार भागात पोहचतो. पूर्वी दादरला गाडी बदलून वळसा घालून जावे लागत होते. मात्र दिवा-वसई मार्गामुळे वळसा घालून वसईकडे जाण्याचा त्रास व वेळ देखील वाचतो. त्यामुळे वसई भागात नोकरीसाठी जाणारे नोकरदार व वापी, गुजरातकडे जाणारे बहुतांशी व्यापारी अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून वसई, विरार भागात जाण्यास पसंती देत असतात.
वसई – दिवा मार्गावर शटल सेवा मर्यादित असल्याने अप्पर कोपर रेल्वे स्थानकात गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असते .लोअर कोपर स्थानकातून अप्पर कोपर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पूर्वी असणारा पादचारी पूल व जिना खूपच अरुंद होता. प्रवाशांची सकाळ-संध्याकाळ या पिक अवर्स मध्ये जिन्यावरुन ये-जा करताना धक्काबुक्की होत असे . पावसाळ्यात छत्री घेऊन ये-जा करताना प्रवाशांची चेंगराचेंगरी होत असे. त्यामुळे या पुलाचे व जिन्याचे रुंदीकरण करावे ,अशी प्रवाशांची मागणी होती .याचे कारण वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होवून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने लोअर आणि अप्पर कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान पादचारी पूल उभारण्याचे काम गेल्या वर्षी सुरू केले होते.