कल्याण पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या पत्रिपुलावर ७६.६७ मीटर लांबीचा गर्डर बसविण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले असून आज ४० मीटर लांबीचा गर्डर पुश थ्रू पद्धतीने सरकवण्यात आला आहे. तर उर्वरित ३४ मीटर लांबीचा गर्डर उद्या रविवारी बसविला जाणार आहे. या कामाची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यभर विकासाची कामे सुरू असल्याचे सांगितले. कल्याणचा ब्रिटिश कालीन पत्रीपुल १०२ वर्षे जुना झाल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर १८ नोव्हेंबर २०१८ रोजी या पुलावर हातोडा मारण्यात आला. मार्च ते जून २०२० मध्ये कोरोना काळात पूर्ण काम बंद ठेवावे लागले होते. अखेर आज पुलाच्या पहिल्या गर्डरचे यशस्वी लॉंचिंग करण्यात आले.
चार तासाच्या मेगाब्लॉकमध्ये ४२ ते ५० मीटर गर्डर सरकवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, सुरक्षित काम करताना ४० मीटर गर्डर सरकवल्या नंतर मेगाब्लॉक संपल्याने काम बंद करण्यात आले. उद्या हा गर्डर बसविला जाणार असून त्यांनतर उर्वरित ३३ मीटर लांबीचा गार्डर आणला जाणार आहे.