कल्याण( सिद्धार्थ गायकवाड) – शिवसेनेच्या बंडाळीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उघड उघड ठाकरे विरुद्ध शिंदे असे गट पडलेले दिसून येत आहे. अनेकांनी निष्ठा जोपासत राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत न जाता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचा निर्णय घेतल्याने आज कल्याण शहरातील सर्व आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जात पक्षप्रमुख ठाकरे यांचा हैासला बुलंद केला आहे.
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून अलिप्त होत मुख्यमंत्री पदापासून त्यांना दूर करीत एकनाथ शिंदे यांनी सेनेतील ४० आमदारांना बंडखोरीत बरोबर घेत महाविकास आघाडी सरकारला हादरा दिला. बंडखोरीला ४० आमदारांची ताकद असल्याने शिवसेनेत मोठी फूट पडल्याचा मेसेज राज्यभर पसरला गेला. या बंडखोरीतून शिवसेनेला वाचविण्यासाठी सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरे आखल्याने द्विधा मनस्थितीत असलेल्या शिवसैनिकांना आधार देण्याचे मोठे काम केले. शिवसेनेवर व बाळासाहेबांवर अपार प्रेम करीत असणाऱ्या कडव्या विचारसरणीच्या शिवसैनिकांनी शिवसेनेतील निष्ठेला महत्त्व देण्याचे काम केले.
कल्याण शहरातील आमदार विश्वनाथ भोईर प्रारंभीच शिंदे यांच्याबरोबर गेल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शहर प्रमुख पद काढत त्यांच्या जागी सचिन बासरे यांची नियुक्ती केली. एकीकडे कल्याण डोंबिवली शिवसेनेचे दिग्गज कार्यकर्ते एकनाथ शिंदे सोबत गेल्याने शिवसेनेला गळती लागली गेली आहे. गळतीला रोखण्याचे काम कल्याण शहरातील महानगर प्रमुख विजय साळवी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आपल्या शिरावर घेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
हेही वाचा – शुश्रुषागृह नियमांची अंमलबजावणी न करण्याऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, आयुक्तांकडे मागणी
आज कल्याण शहरातील किमान चार पाचशे पदाधिकारी व शिवसैनिकांनी थेट मातोश्री गाठीत आम्ही कायम आपल्या सोबत असल्याची निष्ठा दाखवून दिली. शपथ पत्र तसेच किमान ७००० नवीन शिवसैनिकांचे सदस्यांची नोंदणी झाल्याचे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांनी यावेळी सांगत ती उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
कल्याण पश्चिमेत मध्यंतरी आमदार विश्वनाथ भोईर यांनी रेकॉर्ड ब्रेक सभासद नोंदणी शिंदे गटाची होणार असल्याचे जाहीर केले होते यामुळे सभासद नोंदणीसाठी दोन्ही गटात चुरस लागल्याचे बोलले जात आहे. कल्याण शहरातून सचिन बासरे, बाळ हरदास, विजयाताई पोटे, सुरेश सोनार, रवींद्र कपोते, बळीराम जाधव, रोहन कोट, रवींद्र उल्लारे आणि श्रीधर किस्मतराव यांच्यासह किमान ५०० शिवसैनिक मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेत आम्ही आपल्या सोबत कायम राहणार असल्याची ग्वाही दिली आहे.