HomeठाणेThane : ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालयाला मंजुरी

Thane : ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालयाला मंजुरी

Subscribe

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत देशभरात नव्या २८ नवोदय विद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे.

शहापूर । केंद्रीय क्षेत्र योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र जवाहर नवोदय विद्यालय मंजूर व्हावे यासाठी २०१८ पासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत देशभरात नव्या २८ नवोदय विद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात ठाणे जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. या कामी ठाणे जिल्हा परिषदेत ठराव घेऊन तो राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठवण्यासाठी शहापूरकरांनी विशेष पुढाकार घेत पाठपुरावा केला होता. सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत शिक्षण मिळावे, याकरिता केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू केले. मात्र, २०१४ ला ठाणे जिल्हा विभाजन झाल्यापासून, जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालय उपलब्ध होऊ शकलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेचे शहापूरमधील मळेगाव गटाचे तत्कालीन सदस्य राजेंद्र विशे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये जिल्हा परिषद सभेत ठराव घेत स्वतंत्र नवोदय विद्यालयाची मागणी राजकीय पटलावर आणली होती. तसेच, शहापूर तालुक्यात भातसानगर वसाहतीत मोठ्या प्रमाणात शासकीयइमारती उपलब्ध आहेत. तेथे कमीत कमी खर्चात नवोदय विद्यालय सुरू करता येईल, ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.

सहा डिसेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाने २३०० कोटींची आर्थिक तरतूद करत देशात नव्या २८ नवोदय विद्यालयांना म्हणजेच पीएम श्री शाळांना मंजुरी दिली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील नव्या नवोदय विद्यालयासह तीन केंद्रीय विद्यालयांचाही समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे महाराष्ट्रात ३३ नवोदय विद्यालये आहेत. २०१४ ला ठाणे जिल्ह्यातून
पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर पालघर तालुक्यातील माहीम येथे असणारे जवाहर नवोदय विद्यालय पालघर जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. परिणामी, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेशासाठी पालघरला जावे लागत होते. यात नवोदयकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांचा टक्का घसरला आहे. अनेक उच्च दर्जाचे अधिकारी घडवणार्‍या या विद्यालयात दरवर्षी ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ठाणे जिल्ह्यातून सध्या ४० विद्यार्थ्यांना संधी मिळते. आता ठाणे जिल्ह्याला स्वतंत्र विद्यालयाला मंजुरी मिळाल्याने गरीब कुटुंबांतील ८० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे.

संपूर्ण ग्रामीण व डोंगरी तालुका असणार्‍या शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालय सुरू करावे, अशी मागणी शहापूर विधानसभेचे तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांनी २०१८ मध्ये शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. तालुक्यातील भातसानगर येथे विद्यालयासाठी आवश्यक पाच एकर शासकीय जागा तसेच पर्यायी इमारतीही उपलब्ध आहेत. सरकारने या ठिकाणी जिल्ह्याचे जवाहर नवोदय विद्यालय सुरू करावे, असे पत्र बरोरा यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले होते.

ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालय मिळत आहे. मात्र ते शहापूरमध्येच व्हावे, अशी आग्रही मागणी आहे.
– राजेंद्र विशे, माजी जिल्हा परिषद सदस्य, ठाणे

शहापूर हा आदिवासीबहुल तालुका आहे. येथील गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाचे शिक्षण मिळावे, यासाठी नवोदय विद्यालय शहापुरातच होणे गरजेचे आहे. केंद्राचा शासन आदेश पाहून राज्य सरकार व नवोदय विद्यालय समितीकडे त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
-दौलत दरोडा, आमदार, शहापूर विधानसभा

सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या भातसानगर येथे उपलब्ध असलेल्या पाटबंधारे विभागाच्या मोकळ्या जागेवर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नवोदय विद्यालय सुरू करावे. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती.
– पांडुरंग बरोरा, माजी आमदार