भिवंडी शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कामवारी नदीला जलपर्णीच्या विळख्याने आणि परिसरातील कारखाने, डाईंगमधून सोडण्यात येणाऱ्या आणि गटारांतील प्रदूषित पाण्याने,नदीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याने सदर कामवारी नदी प्रदूषणाच्या विळख्याने गुदमरली असून मरणपंथाला आली आहे. तरीही याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमीमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा होत आहे आणि शासनाकडूनही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून पर्यावरण समृद्ध करण्याचे आवाहन करण्यात येत असताना मात्र दुसरीकडे भिवंडी शहराच्या सीमेवर शेलार येथील कामवारी नदी मात्र प्रदूषण आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकली असून मरणपंथाला आली असल्याचे चित्र दिसत आहे.या नदीला मोठ्या प्रमाणात एका विशिष्ट प्रकारच्या जलपर्णीचा विळखा पडला असून येथील शेलार, खोणी, काटई, कांबे या गावातील आणि भिवंडी शहरातील जीन्स पॅन्टच्या कारखान्यातील आणि डाईंग,लूम आणि परिसरातील लहान मोठ्या कारखाने,उद्योगधंदे यांतील प्रदूषित कलरचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता या नदीत सोडण्यात येत असल्याने सदर नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे.
नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचराही टाकण्यात येत आहे या सर्वांमुळे नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.हा गाळ साधारण वीस फुटाहूनही अधिक खोल असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या विषयावर प्रदूषण निर्मूलन शेतकरी समिती यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी आणि स्थानिक आणि संबंधित सर्व प्रशासन यांना वारंवार निवेदने देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी नसलेल्या या विना परवानग्या डाईंग आणि छोटया मोठ्या उद्योगधंद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर नदीमधील या प्रदूषणाच्या विषयावर आणि या नदीचे पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने भिवंडी महापालिका आणि ओसवाल महाविद्यालय यांच्या विद्यमाने दोन वर्षापूर्वी कामवारी नदी बचाव कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मॅगेससे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह,यशदा संस्थेचे संचालक डॉ.सुमंत पांडे,संयोजक डॉ.स्नेहल दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी सदर नदीच्या प्रदूषणावर आणि पुनर्जीवित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.त्यावेळी जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी ही नदी पुनर्जीवित करण्यासाठी पाच उपाय आणि कामे सुचवून या नदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण असल्याचे सांगत मार्गदर्शन केले.परंतु त्यानंतर प्रशासनाकडून ठोस पावले आणि उपाययोजना अद्यापही करण्यात आलेली नाही. नदीची स्वच्छता आणि प्रदूषण या मुद्द्यांवर शहरी प्रशासन आणि ग्रामीण प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.परंतु असेच चालू राहिल्यास सदर नदी एक नाला होऊन नामशेष होईल. यात तिळमात्र शंका उरलेली नाही.
हेही वाचा –
राज-उद्धव एकत्र येणार का? मुख्यमंत्री म्हणतात, ‘काळ कठीण, सर्वांनी एकत्र येणं आवश्यक’