स्वच्छ जल, स्वच्छ मन हे ध्येय समोर ठेवत ठाणे महानगरपालिका आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन माध्यमातून रविवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत ठाण्यातील कचराळी तलाव येथे सुमारे ४०० हून अधिक निरंकारी अनुयायांनी तलाव परिसर स्वच्छ केला. या उपक्रमात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने या अभियानासाठी सहाय्य केले.
देशभरात एक हजाराहून जास्त ठिकाणी आणि २७ राज्यात एकाच वेळी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ जल आणि जल रक्षणासाठी असलेल्या या अमृत योजनेचे उद्घाटन निरंकारी सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या हस्ते दिल्ली येथे झाले. या प्रसंगी निरंकारी राज पिताजी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. या अभिनव उपक्रमात संत निरंकारी मिशनच्यासुमारे दीड लाख स्वयंसेवांनी भाग घेतला.
ठाणे शहरात कचराळी तलावासोबतच, रायलादेवी तलाव, दिवा येथील अगासन व गणेश नगर तलाव, ओवळा तेथील हार्ट लेक तलाव, तर कळवा येथील न्यू शिवाजी नगर तलाव येथे हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कचराळी येथील स्वच्छता अभियानाचे काम पाहण्यासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मध्यप्रदेशमधील जिल्हाधिकारी नवजीवन पवार, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आदींनी भेट दिली. त्यांनी निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन निरंकारी मिशनच्या ठाणे सेक्टरचे संयोजक आर. एस. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे व कोपरी शाखेच्या वतीने करण्यात आले.