ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्ण संख्या ही आता कमी होताना दिसत आहे. त्यातच या आजाराला हरवून घरी परतणाऱ्यांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. तर क्रिटिकल असलेल्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्याही आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. मात्र व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या किती काही केले तरी कमी होत नसल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. २३ एप्रिल ते २३ मे दरम्यान व्हेंटिलेटरवरील रुग्ण संख्या ५०० च्या घरात कायम घर करून बसली आहे. ही संख्या नवीन जनरेशन त्यातच आजाराकडे केला दुर्लक्षपणा आणि इन्फेक्शन या सारख्या गोष्टींमुळे दिसत असल्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे. ती संख्याही नक्कीच कमी होईल असे ही आरोग्य विभागाने सांगितले आहे.
मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त होते. यामध्ये कुटुंबच्या कुटुंब पॉझिटिव्ह आढळून येत होते. जिल्ह्यात अवघ्या ५० दिवसात दोन लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यामध्ये एक लाख रुग्ण हे ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन महापालिका हद्दीत आढळून आले होते. या वाढत्या रुग्ण संख्येने आरोग्य विभागावर ही ताण वाढला होता. त्यातच बेड्स पासून रेमडीविर इंजेक्शन असो या ऑक्सिजन बेड्स मिळविण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ झाली होती. खासगी रुग्णालयात बेड्स मिळत नसल्याने रुग्णांनी शासकीय रुग्णालयात जाऊन उपचारही घेतल्याने शासकीय रुग्णालयात फुल होते. हीच बाब राज्यात सर्वत्र होती. त्यामुळे ही रुग्ण संख्या कमी करायची कशी असा प्रश्न राज्यशासनासमोर नाचत होता. सुरुवातीला निर्बंध घातले आणि अखेर लॉकडाऊन करण्याची वेळ आल्यावर रुग्ण संख्येत हळूहळू घटताना दिसून लागली. त्यातच ८६.२० टक्क्यांवर आलेली कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारी वाढून सध्या ९५.५३ वर सध्याच्या घडीला पाहण्यास मिळत आहे. जवळपास दुसऱ्या लाटेला थोपण्याच्या प्रयत्नात यश येत असताना ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
दुसऱ्या लाटेत जास्तीतजास्त ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली होती. या संख्येने जिल्ह्यात ८ हजारांचा आकडा ही पार केला होता. व्हेंटिलेटरवरील रुग्ण संख्येने पावणे सहा ते सहा हजारांच्या घरात झेपही घेतल्याचे पाहण्यास मिळाले. मध्यंतरी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्ससाठी मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती. दरम्यान आता रुग्ण संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ८ हजार ८५७ झाली असून ४ लाख ८६ हजार १३३ रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. तर ८ हजार ८६७ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.सध्याच्या घडीला म्हणजे २३ मे रोजी १३ हजार ८५७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहे. त्यामध्ये ३ हजार ८३५ जण क्रीटीकल झोन मधील असून ३ हजार ३१९ ऑक्सिजनवर तर ५१६ व्हेंटिलेटरवर आहेत.
२३ एप्रिल रोजी ८ हजार २१६ रुग्ण क्रीटीकल झोन मध्ये होते. त्यामध्ये ७ हजार ६७८ रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. तर ५३८ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. या आकडेवारी पाहिल्यास ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजाराने कमी झाली आहे. व्हेंटिलेटरची संख्या ५००च्या खाली आलेली दिसत नाही . ऑक्सिजन लागण्याची संख्या मोठया संख्येने कमी होत असताना व्हेंटिलेटरवरील संख्या कमी होत नसल्याने यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याची भीती वर्तवली जात आहे.
“मध्यंतरी जशी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची चौकशी होत होती, तशी चौकशी सध्या या दोन्ही बेड्स साठी होताना दिसत नाही. ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. मात्र या आजाराचा संसर्ग ज्यांना जास्त झाला आहे. तेच व्हेंटिलेटरवर आहे. ती संख्याही कमी होईल. तर लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यातच आता म्युकरमोयकोसिस हा आजार ही पुढे आला असून त्याचे रुग्ण ही वाढू लागले आहेत. ”
– डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.
जिल्ह्यातील रुग्णांचा तक्ता
स्वराज्य २३ एप्रिल २०२१ २३ मे २०२१
संस्था ऑक्सिजन व्हेंटिलेटर ऑक्सिजन व्हेंटिलेटर
ठामपा १५१७ १७१ ५७७ १६२
नवीमुंबई २४४५ १८७ ८५८ १७५
केडीएमसी १९९७ ०४७ ७५७ ०५४
मीरा-भाईंदर ८८२ ०९० ५१० ०६६
भिवंडी २४० ०१६ ०७० ०१४
उल्हासनगर ००० ००० ०५७ ०००
अंबरनाथ ३०६ ०१५ १४३ ०२९
बदलापूर २९१ ०१२ २५६ ०११
ठाणे ग्रामीण ००० ००० ०९१ ००५
————————————————————
एकूण ७६७८ ५३८ ३३१९ ५१६