सोशल मीडियावर नेहमीचं काही न काही विचित्र किंवा अनोख्या घटना व्हायरल होत असतात. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. विमानाने जात असताना आपल्याकडील बॅग्स आणि त्यांचे वजन हे ठराविक असणं बंधनकारक असतं. विमानतळावर पोहोचल्यावर बॅगमधील सामानाचे वजन जास्त असल्याने काही न काही जुगाड करून ते प्रमाण वजनाएवढे केल्याचे अनेक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. असाच अनोखा एक प्रकार चीनच्या युनान प्रांतातून समोर आला आहे. सामान जास्त झालं असल्याने अतिरिक्त शुल्क विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भरावं लागतं. आणि तेच शुल्क द्यायला लागू नये म्हणून चार व्यक्तींनी असा काही जुगाड केला की, त्यावर तुमचा विश्वास ठेवणं शक्य नाही. चीनमध्ये घडलेल्या या घटनेत चौघं विमान प्रवाश्यांकडे ३० किलो संत्रे होते, त्यामुळे सामानाचं वजन जास्त झालं असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यासाठी अतिरिक्त पैसे भरावे लागू नये, म्हणून या चौघं पठ्ठ्यांनी तब्बल ३० किलो संत्रे अवघ्या अर्ध्यातासातच संपवले. त्यानंतर असं काही झालं की तुम्ही देखील हैराण व्हाल हे नक्की.
असा घडला प्रकार
चीनच्या युनान प्रांतात वांग नावाच्या व्यक्तीने त्याच्या मित्रांसाठी ८-१० किलो नाही तर ३० किलो संत्र एका बॉक्समध्ये पॅक करून आणले होते. वांग नाव असणारा व्यक्ती त्याच्या मित्रांसोबत बिजनेस ट्रिपला निघाले होते. यावेळी त्याच्याकडे एक संत्र्याचा बॉक्स होता. त्यातील ३० किलो संत्र त्यांनी ५० युआन म्हणजे साधारण ५६४ रुपयांनी खरेदी केला होता. पण विमानतळावर पोहोचल्यावर सामानाचे वजन जास्त असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी त्यांना या एक्स्ट्रा सामानासाठी ३०० युआन म्हणजे जवळपास ३ हजार ३८४ रुपये मोजावे लागणार होते. या एक्स्ट्रा सामानाचे वजन त्यांना द्यायला लागू नये म्हणून त्यांनी एक जुगाड केला. आणि हा जुगाड म्हणजे त्या चौघांनी विमानतळावरच तब्बल ३० किलो संत्र अवघ्या अर्ध्यातासात संपवले असल्याचे सांगितले जात आहे.
म्हणून त्यांनी खाल्ले ३० किलो संत्र
ग्लोबल टाइम्सला वांगने दिलेल्या माहितीनुसार, वांग आणि त्याच्या मित्रांनी एक्स्ट्रा लागणारे चार्जेस टाळण्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागणार होते. त्यामुळे हे ३० किलो सर्व संत्रे विमानतळावरच खाण्याचं ठरवले. तब्बल ३० किलो संत्र अवघ्या २० ते ३० मिनिटांमध्ये संपवून टाकले. मात्र या जुगाडाचा सर्व मित्रांना चांगलाच फटका बसला. ३० किलो संत्र एकत्र मिळून खाल्ल्याने त्या चौघांच्या तोंडात अल्सरचा त्रास जाणवू लागला. “आता आयुष्यात पुन्हा कधीही संत्रे खाण्याची इच्छा होणार नाही”, असेही त्यांच्याकडून सांगितले गेले. दरम्यान हा प्रकार आणि हा जुगाड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.