निवडणुका म्हणजे प्रचार, साकडं, आरोप, प्रत्यारोप, आमिषं, आश्वासनं असं बरंच काही असतं. पण निवडणुका म्हणजे भलताच गोंधळही असतो हे जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातल्या निवडणुका पाहिल्यावर अगदी तंतोतंत पटतं. असाच काहीसा ‘भलताच’ गोंधळ मुंबईजवळच्या भिवंडीमध्ये घडला आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा हंगाम असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमेदवार प्रचाराला देखील लागले आहेत. भिवंडी ग्रामीणमधल्या वॉर्ड क्रमांक ४ ‘ड’मधला हा गोंधळ इतका व्हायरल झाला, की त्याचा या दोन्ही महिला उमेदवारांच्या कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप होऊ लागला आहे.
त्याचं झालं असं…
भिवंडी ग्रामीणमध्ये येत्या १५ जानेवारीला ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये शिवसेनापुरस्कृत अग्निमाता ग्रामविकास पॅनेलकडून वॉर्ड क्रमांक ४ ‘ड’मधून सौ. सुजाता कल्पेश म्हस्के आणि सौ. कोमल कल्पेश म्हस्के या दोन महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. या दोघींची निवडणूक चिन्ह देखील वेगवेगळी आहेत. पण त्यांच्या नावापुढे लागलेलं पतीचं नाव आणि आडनाव देखील सारखंच असल्यामुळे त्यांची पंचाईत झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकाच बॅनरवर दोघींची नावं झळकल्यामुळे या दोघींचे पती एकच आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली! सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर देखील ‘एकाच वॉर्डात नवरोबांनी आपल्या दोन पत्नींना निवडणुकीसाठी उभे केले’, अशा प्रकारचे विनोदी मेसेज व्हायरल केले जाऊ लागले.
असा आहे तो घोळ!
तर यातली पहिल्या कल्पेशचं नाव कल्पेश बारक्या म्हस्के असं आहे, तर दुसऱ्या कल्पेशचं नाव कल्पेश सुरेश म्हस्के असं आहे. कल्पेश बारक्या म्हस्के हे कल्पेश सुरेश म्हस्केचे चुलत काका लागतात. सुजाता यांचं २०१६ साली कल्पेश बारक्या म्हस्के यांच्याशी लग्न झालं. तर कोमल यांचं कल्पेश सुरेश म्हस्के यांच्याशी २०१७ मध्ये लग्न झालं. पण आता या दोघींची नावं सारखीच झाल्यामुळे सगळाच घोटाळा होऊन बसला आहे.
आता यावर उपाय काय?
आत्तापर्यंत आपलं नाव पूर्ण लिहिण्याचा किंवा सांगण्याचा प्रघात होता. यामध्ये आपलं नाव, मधलं नाव आणि आडनाव यांचा समावेश होता. पण आता या दोन्ही महिला उमेदवारांच्या नावातल्या घोळामुळे त्यांना त्यांच्या नवऱ्यांची नावं देखील लिहिली, तर कदाचित हा घोळ टाळता येऊ शकेल. म्हणजे सुजाता यांनी सौ. सुजाता कल्पेश बारक्या म्हस्के आणि कोमल यांनी सौ. कोमल कल्पेश सुरेश म्हस्के अशी नावं लिहिली, तर नेटिझन्स आणि मतदार या दोघांचा घोळ काहीसा कमी होऊ शकेल!