संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनला जोरदार धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या कराची शेअर बाजारावर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्याचा निषेध करत चीन भारताविरोधी मोर्चेबांधणी करण्याच्या प्रयत्नात होता. त्याबद्दलचा प्रस्ताव चीनकडून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मांडला जाणार होता. मात्र अमेरिकेने अगदी शेवटच्या क्षणी आक्षेप नोंदवला. त्यामुळे चीनला जोरदार झटका बसला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत न्यूयॉर्कमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कोणीही आक्षेप न घेतल्यास त्या कराराला मंजुरी मिळते. मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता जर्मनीने प्रस्तावाला आक्षेप नोंदवला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दहशवतवादी हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. आम्हाला हे मान्य नाही, असा आक्षेप जर्मनीने घेतला. त्यानंतर लगेचच चिनी राजदूतांनी जोरदार विरोध केला. या दरम्यान घड्याळाचा काटा ४ च्या पुढे गेला. त्यानंतर प्रस्तावाची डेडलाईन १ जुलै सकाळी १० पर्यंत करण्यात आली. सुरक्षा परिषदेत दुसऱ्या दिवशी पुन्हा चीनकडून प्रस्ताव मांडण्यात आला. घड्याळाचा काटा १० च्या जवळ जाताच अमेरिकेने आक्षेप नोंदवला. त्यामुळे चीनला पुन्हा धक्का बसला. आता चीनकडून पुन्हा हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. मात्र चीन आणि पाकिस्तानला दोन देशांनी धक्का दिला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही देश भारतासाठी धावून आले आहेत.