सध्या महाराष्ट्रात जो राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. तो अभुतपूर्व अशा वळणावर आलेला आहे. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात देखील पोहोचले आहे. महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य कर्नाटकमध्ये देखील जुलै महिन्यात असाच पेचप्रसंग उद्भवला होता. त्यावेळी काँग्रेसचे दहा बंडखोर आमदार भाजपला जाऊन मिळाले होते. त्यानंतर हे दहा आमदार पवईच्या रेनेसाँ हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आले होते. आताही राष्ट्रवादीच्या ४१ आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवले असून भाजपचे मंत्री हॉटेलमध्ये घिरट्या घालत आहेत. त्यामुळे या हॉटेलमधून भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसची सत्ता उलथवून लावली होती. त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील महा विकास आघाडीला खो देऊन विधानसभेत बहुमत सिद्ध करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढचे सहा दिवस पुन्हा एकदा हॉटेल रेनेसाँ चर्चेत असण्याची शक्यता आहे.
थोडक्यात कर्नाटकचे ऑपरेशन लोटस
कर्नाटकमध्ये २०१८ मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने २२२ जागांपैकी १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. मात्र बहुमतापासून ते लांब राहिले. तर काँग्रेसने ७८ आणि जेडीएस (जनता दल – सेक्युलर) ने ३८ जागा मिळवल्या होत्या. काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी छोटा पक्ष असलेल्या जेडीएसला मुख्यमंत्रीपद देऊन टाकले. त्यामुळे जेडीएसचे प्रमुख कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले.
Mumbai: Maharashtra State Reserve Police Force & Riot Control Police arrive at the hotel where 10 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs are staying.The MLAs had earlier written a letter to Police stating "We heard CM & DK Shivakumar are going to storm the hotel, we feel threatened" pic.twitter.com/ZQet2h1kmP
— ANI (@ANI) July 9, 2019
त्यानंतर वर्षभरातच भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या १६ आमदारांना आपल्या गळाला लावले. या आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला मात्र त्यापैकी फक्त सहा आमदारांचा राजीनामा स्वीकारण्यात आला होता. इतर १० जणांचा राजीनाम्याच्या पत्रात मजकुराचा घोळ असल्यामुळे ते नाकारण्यात आले होते. त्यानंतर हे दहा आमदार पवईतील हॉटेल रेनेसाँमध्ये थांबले. काँग्रेसचे संकटमोचक डे.की. शिवकुमार हे या आमदारांची समजूत घालण्यासाठी हॉटेलमध्ये आले असताना त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बहुमत चाचणीत भाजप १०५ विरुद्ध जेडीएस-काँग्रेस ९९ अशा मतांनी जेडीसचे सरकार अल्पमतात आले होते.
नवाब मलिक म्हणतात यावेळी आम्ही सरकार बनवू
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. ते म्हणतात की, “काय योगायोग आहे. याच रेनेसाँ हॉटेलमध्ये भाजपने कर्नाटकचे सरकार पाडले होते. आता याच हॉटेलमध्ये आम्ही महाराष्ट्राचे सरकार बनवू”.
क्या संजोग है इसी रेनिसिन्स होटल से बीजेपी ने कर्नाटक की सरकार गिराई थी और इसी होटल से हम महाराष्ट्र की सरकार बनाएं गे ।
— Nawab Malik (@nawabmalikncp) November 24, 2019
नवाब मलिकांच्या या ट्विटनंतर रेनेसाँ हॉटेल आणि राजकीय पेचप्रसंग याची पुन्हा एकदा उजळणी झाली. सरकार पाडण्यासाठी किंवा स्थापन्यासाठी या हॉटेलमध्ये आमदार ठेवले जातात, याची नोंद राजकीय इतिहासात नक्कीच होईल.