एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदांमधून भाजप आणि राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीवर तिन्ही पक्षांनी टीका केली. मात्र, त्याचवेळी भाजपनं मात्र उलटपक्षी शिवसेना आणि शरद पवारांनाच टार्गेट केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच महायुतीला बहुमत मिळालं होतं. पण निवडणुकांचे निकाल आल्यानंतर शिवसेना कुणाच्या इशाऱ्यांवर इतकी आक्रमक झाली? शरद पवारांचं आणि काँग्रेसचं म्हणणं होतं की त्यांना विरोधात बसण्याचा जनादेश होता. मग खुर्चीवर बसण्याचं मॅच फिक्सिंग कसं झालं?’ असा सवाल भाजपचे केंद्रीय कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केला आहे. तसेच, ‘शिवसेनेने शिवरायांविषयी बोलू नये’, असा खोचक सल्ला देखील त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी ‘भाजप नक्कीच बहुमत सिद्ध करेल’, असा विश्वास व्यक्त केला.
‘हा तर मुंबई हडपण्याचा कट’
दरम्यान, यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून शिवसेनेला टोला लगावला. ‘आता असं म्हटलं जात आहे की लोकशाहीची हत्या करण्यात आली. शिवसेना स्वार्थी हेतूमुळे ३० वर्षांची युती तोडून विरोधी विचारसरणीच्या पक्षांसोबत आघाडी करते, पण जेव्हा देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र समस्या निर्माण होते. हे नवीन सरकार राज्याला स्थिर सरकार देईल. विरोधकांचा देशाच्या आर्थिक राजधानीवर मागच्या दाराने ताबा मिळवण्याचा कट होता’, असं रवीशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.
‘शिवसेना बाळासाहेबांचे आदर्श जिवंत ठेऊ शकत नाही’
‘जे बाळासाहेब ठाकरेंचे आदर्श जिवंत ठेऊ शकत नाहीत, त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंचा प्रामाणिक काँग्रेस विरोध सगळ्यांना माहिती आहे. सत्तेसाठी तडजोड करणाऱ्यांनी शिवाजी महाराजांबद्दल बोलू नये’, असं देखील रवीशंकर प्रसाद म्हणाले.