घरमहाराष्ट्रशिवसेनेला डिवचण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद

शिवसेनेला डिवचण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद

Subscribe

भाजप-शिवसेनेच्या भांडणाचा नारायण राणे यांना फायदा

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, शिवनसेनेला डिवचण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची अरविंद सावंत नंतर केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती ‘न्यूज१८लोकमत’ या वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या भांडणात नारायण राणे यांना फायदा होणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रात भाजपने सत्ता स्थापनेतून माघार घेतल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनेला सत्ता स्थापन करायची असले तर त्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जरुरीचा आहे. मात्र, शिवसेना एनडीएतून बाहेर पडली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत.


हेही वाचा – भाजप आज युतीबाबत मोठी घोषणा करणार

- Advertisement -

शिवसेनेपासून नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील कटुता सर्वश्रूत आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला होता. याशिवाय भाजपने कणकवली मतदारसंघातून राणे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, युती असूनही राणे यांच्या विरोधात शिवसेनेने सतीश सावंत नावाचे उमेदवार उभे केले होते. अखेर नितेश राणे यांचा विजय झाला. नारायण राणे यांची राजकीय कारकिर्दी ही शिवसेनेपासून सुरु झाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काही वर्षांनी त्यांनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. या निवडणुकीत त्यांनी या पक्षाचे भाजपात विलीनीकरण केले. आता भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद वाढले आहेत. त्यामुळे शिवसेनेला दुखवण्यासाठी भाजप राणे यांना मंत्रीपद देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.


हेही वाचा – मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपचे लव्ह जिहाद होते का? – संजय राऊत

- Advertisement -

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून शिवसेनेला केंद्रीय मंत्रीमंडळात फक्त एकच मंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे शिवसेना नाराज झाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेला राज्यातील मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेली आहेत. भाजपने सत्ता स्थापनेतून माघार घेतल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण पाठवले आहे. मात्र, त्यासाठी फक्त २४ तासांचा कालावधी देण्यात आला आहे. याच पार्श्नभूमीवर महाराष्ट्रात अत्यंत जलद गतीने घडामोडी घडत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -