2014 च्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून सेना-भाजपचे बिघडले आणि 25 वर्षे गुण्यागोविंदाने राहणारे हे पक्ष ऐन घटस्थापनेच्या मुहुर्तावर वेगळे झाले होते. तेव्हाही मोठा भाऊ कोण ही लढाई या दोन्ही पक्षांमध्ये होती. एव्हाना शिवसेनेलाही राज्यात मोठा भाऊ कोण? हे कळून चुकले असावे आणि त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत आढेवेडे न घेता शिवसेना युतीस तयार झाली. 2019 च्या लोकसभा निवडणूकित एकत्र आलेले हे दोन्ही पक्ष आता विधानसभा निवडणुकीत देखील एकत्र येण्याची शक्यता आहे. काही जागांचा अपवाद वगळता युती अंतिम टप्प्यात आहे. मात्र युती झाली तरी राज्यात आपणच कसे मोठे भाऊ राहू शकतो याची देखील पुरेपूर काळजी भाजपने घेतली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शिवसेना-भाजप युती झाली तरी आपल्याच सर्वाधिक जागा कशा निवडून येतील आणि आपला मुख्यमंत्री कसा होईल, यासाठी भाजपने आधीपासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे. एवढेच नाही तर तसे मनसुबेच भाजपने रचले आहेत. शिवसेना-भाजप युती अंतिम टप्प्यावर असताना एकटा भाजप कसा बहुमताचा आकडा गाठू शकेल यावर सध्या भाजप काम करत असून, भाजपने आपले ‘अबकी बार 140 पार’ असे टार्गेटच जणू ठरवले आहे. त्यामुळेच की काय बहुमताचा आकडा पार करण्यासाठी भाजप इतर मित्र पक्षाना देखील भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी तयार करत आहे.
रासप, शिवसंग्राम, रयत क्रांतीच्या उमेदवारांना भाजप कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगणार आहे. यामध्ये नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा देखील समावेश आहे. राणेंचे पूत्र आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना देखील भाजपच्या तिकीटावर उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. आता मित्रपक्ष यावर किती राजी होतात हा पुढचा भाग. पण मुख्यमंत्री पुन्हा भाजपाचा व्हावा आणि आपणच राज्यात मोठा भाऊ म्हणून मिरवावे याचा जणू भाजपने चंगच बांधला आहे.
महायुती राज्यात 220 जागा जिंकेल तर एकट्या भाजपला 140 च्या वर जागा जिंकता येतील, असे भाजपचे नेते छातीठोकपणे सांगत असेल तरी शिवसेनेच्या जागा कमी कशा होतील, याची देखील भाजप पुरेपुर काळजी घेताना दिसत आहे. भाजपचे सध्या 122 आमदार आहेत त्यातच भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. याच जोरावर भाजपचे सहज 140 च्या वर आमदार निवडून येतील, असा भाजपला विश्वास आहे.
तसेच टार्गेट समोर ठेवूनच शिवसेना – भाजप युती झाली तर शिवसेनेला 110 जागा सोडण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. तसेच उरलेल्या जागा स्वत: लढत बहुमताचा आकडा गाठायचा मनसुबा भाजपने आखला आहे. दरम्यान यासाठी भाजपाने पूर्व तयारी केली असून, भाजपची भिस्त ही बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख केंद्रांवर आहे. आतापर्यंत भाजपचे ८६ हजार बूथ प्रमुख झाले असून, एका बुथ प्रमुखाच्या हाताखाली २५ जण देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत ७५ टक्क्यांहून अधिक बूथ समित्या नेमण्यात आल्या आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात १८ हजार शक्ती केंद्र नेमण्यात आले आहेत.
इच्छुकांचे काय करणार?
140 चा आकडा पार करण्यासाठी काय पण, अशी रणनीती आखलेल्या भाजपच्या या खेळीमुळे भाजपमधील काही इच्छुक मात्र नाराज झाले आहेत. भाजपमध्ये वारंवार होत असलेल्या मेगा भरतीमुळे भाजपमधील निष्ठावंत दुखावेल असून, आपले काय होईल, अशी चिंता काही निष्ठावंतांना सतावू लागली आहे. दुखावलेल्यांमध्ये भाजप आमदारांमध्ये मंदा म्हात्रे यांचा देखील समावेश असून, त्यांनी आपली ही खंत खुद्द मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली. मात्र मुख्यमंत्र्यांनी मंदा ताई तुम्ही निश्चिंत राहा असा शब्द दिला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजपने नुकताच प्रवेश देत त्यांना उमेदवार देखील देण्याचे निश्चित केले आहे. यामुळेच विद्यमान आमदार मंदा म्हात्रे या नाराज आहेत. मंदा म्हात्रे यांच्या प्रमाणे भाजपचे अनेक विद्यमान आमदार अस्वस्थ असून, काय करावे असा प्रश्न देखील आमदारांना पडला आहे. एकीकडे मंदा म्हात्रे यांच्या सारखे विद्यमान आमदार नाराज असताना भाजपच्या आणखी एक मास्टर प्लॅन डोक्यात आहे. तो म्हणजे नाराजांना विचार करण्याचा वेळ न देता ऐनवेळी उमेदवार जाहीर करून उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात येणार आहेत.