‘शिखंडी सारखे वार करु नका, मर्दासारखे समोर येऊन लढा’, अशा कडक शब्दांत पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांवर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्या या उमेदवारी अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात डिसेंबर २०१८च्या नोटरीचा शिक्का वापरला गेला आहे. त्यामुळे विरोधकांकडून हा अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या विषयावर विरोधकांकडून इतका गदारोळ झाला की प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत गेले. यावर बंद दरवाज्या आड सुनावणी झाली आणि अखेर या सुनावणीत मुख्यमंत्र्यांच्या बाजूने निर्णय लागला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
‘शिखंडी सारखे वार करु नका, मर्दासारखे समोर येऊन लढा. नोटरीमध्ये चूक असेल तर ती चूक नोटरीची आहे. उमेदवाराची त्यात काहीच चूक नाही. अर्ज योग्यच आहे आणि याशिवाय नोटरी नसली तरी फॉर्म रद्द होत नाही, असे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. ते दाखले आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे जोडले आहेत’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्ज वैध, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश pic.twitter.com/2FDjzOW0Qd
— My Mahanagar (@mymahanagar) October 5, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर एकेकाळी भाजपचे आमदार असलेल्या आशिष देशमुख यांनी फडणवीस यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणाची आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणीनंतर हा अर्ज वैध असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. ज्या वकिलाने फडणवीस यांच्या अर्जाची नोटरी केली होती, त्यांचा नोटरीचा कालावधी वाढविण्यात आला असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.