घरमहाराष्ट्रभाजपची परिस्थिती म्हणजे ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’ - शरद पवार

भाजपची परिस्थिती म्हणजे ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’ – शरद पवार

Subscribe

“पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घेतला, मात्र त्याचे क्रेडिट दुसऱ्याने घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’ अशी सध्याची भाजपाची परिस्थिती आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र श्रेय मोदी घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

आज पुणे जिल्हयातील शिरुर मतदारसंघातील उरळी कांचन येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. आघाडी सरकार असताना शिरूर भागात कारखानदारी आणली गेली. हे काही फडणवीस सरकारच्या काळात झालेली कामे नाहीत. मात्र आज अवस्था काय आहे? पिंपरी-चिंचवड येथे मुलांना नोकऱ्यांमधून काढून टाकत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. परिस्थिती सांभाळण्याची क्षमता यांच्यात नाही, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

- Advertisement -

“निवडणुकांच्या प्रचाराचा पारा सध्या चढू लागला आहे. गुजरातचे एक भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नाही तरी यांच्या तोंडात माझेच नाव. निवडणूक शरद पवार या एका नावावरच लढवत आहेत”, अशा शब्दात अमित शहा यांचे नाव न घेता शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला.

मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात काही नोंद आहे का? मी काही गोंधळ केला का? जाब विचारता का? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून ३७०चा मुद्दा पुढे केला जात आहे. अमित शाह महाराष्ट्रात सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथले घरदार सोडून काश्मिरात कोण जाणार शेती करायला? अशी विचारणा शरद पवार यांनी जाहीर सभेत केली. सध्या कुणी मुद्याचे बोलतच नाही, महागाईवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला, असा सल्लाही भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना शरद पवार यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -