“मुख्यमंत्री सांगतात माझं सरकार पारदर्शक… निष्कलंक होतं… माझ्या सरकारवर कुणी आरोप केले नाही. मग धनंजय मुंडे यांनी २० मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. त्यांच्यापैकी काहींना का उमेदवारीची तिकीटं नाकारली… अहो चोरी करणारा जज म्हणून बसला तर निकाल काय लागायचा केसचा” अशी टीका शरद पवार यांनी दौंड येथील सभेत मुख्यमंत्र्यावर जोरदार घणाघाती टिका केली.
“विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २० मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दिली. मुख्यमंत्र्यांने सांगितले मी तपासलं यात काही नाही. म्हणून आम्ही तिसऱ्या माणसाकडे तपासायला द्यायला सांगितले. यांनी जर चुकीचं काही केलं नसेल तर मग मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांना पुन्हा तिकीट का नाकारले. पाच मंत्र्यांना तिकीट पुन्हा दिलं नाही. त्यांना का वगळण्यात आलं? कुठेतरी-काहीतरी गडबड आहे. म्हणून त्यांना तिकीट दिलं नाही. ज्यांना तुम्ही तिकीटं देवू शकत नाही. त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि आम्हाला सांगतात आमचं सरकार पारदर्शक आहे, यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?” असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.
राज्यात पाच वर्षापूर्वी आलेल्या सरकारला राज्यातील लहान घटकांची चिंता नाही, असे सांगताना शरद पवार म्हणाले की, सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याउलट केंद्रसरकारने देशातील धनिकांचे कर्जाचे ओझे माफ करून ८२ हजार कोटींचे कर्ज फेडले. आज संपूर्ण देशात शेतीची अवस्था बिकट आहे, हे या राज्यकर्त्यांच्या नजरेत कसे येत नाही? असा संतप्त सवालही शरद पवार यांनी सरकारला केला.
हे वाचा – भाजपची परिस्थिती म्हणजे ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’ – शरद पवार