राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर पुढचं सरकार कुणाचं येणार? याची चर्चा शिगेला पोहोचली असतानाच आता शरद पवार-राज ठाकरे भेटीची चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शरद पवार राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बुधवारी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी विधानसभा निवडणुकांविषयी त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शरद पवार आणि राज ठाकरे यांची देखील भेट नक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार, येत्या आठवड्याभरात या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकते.
‘विरोधक विस्कळीत असल्यामुळे अपेक्षित यश नाही’
संदीप देशपांडे यांना शरद पवारांना भेटण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सिल्व्हर ओकला जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमध्ये शरद पवारांनी राज्यातल्या राजकारणावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यासोबतच, माहीम मतदारसंघात मनसेचा पराभव कशामुळे झाला, याची कारणं देखील शरद पवारांनी जाणून घेतली. माहीम आणि नाशिकमधल्या मतदारसंघांमध्ये मनसेची चांगली स्थिती होती. मात्र, लोकांना भाजपविरोधात मतदान करायचे असून देखील विरोधकांची आघाडी विस्कळीत असल्यामुळे अपेक्षित यश गाठता आलं नाही, अशी टिप्पणी यावेळी शरद पवारांनी केली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. मात्र, निकाल लागल्यानंतर जवळपास आठवडा उलटून देखील अद्याप दोन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेच्या वाटाघाटी निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेऊन राज्यात सत्तेची नवी समीकरणं उदयाला येतील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.