राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी वेळ वाढवून दिला नसल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज, बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या वतीने अॅड. कपिल सिब्बल हे कोर्टात बाजू मांडणार आहेत. ही माहिती शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिली आहे.
सेनेचे आमदार परतीच्या मार्गावर
शिवसेनेचे सर्व आमदार रिट्रीट हॉटेलवरुन आपल्या घरी परतले आहेत. ६ दिवसांपासून हे आमदार रिट्रीट हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. या आमदारांना आता घरी जाण्यास परवानगी दिली आहे.
कॉंग्रेस – राष्ट्रवादीची बैठक रद्द – पवार
कॉंग्रेस – राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे. प्रमुख नेते उपस्थित असताना देखील बैठक रद्द झाल्यामुळे नेमके काय घडले याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. तसेच मी आता बारामतीला जात असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मान्य न होणाऱ्या अटी शिवसेनेने ठेवल्या
‘शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याचा कोणताही विषय आमच्यासमोर आलाच नव्हता. विधानसभा प्रचाराच्या दरम्यान मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे सांगत होतो. जर कुणाला त्याबद्दल आक्षेप होता, तर तेव्हाच का नाही सांगितले?’, असे प्रत्युत्तर अमित शाह यांनी शिवसेनेला दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी हे धक्कादायक विधान केले आहे.
जयंत पाटलांनी घेतली पवारांची भेट
जयंत पाटलांनी आज शरद पवारांची भेट घेतली असून थोड्याच वेळात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची बैठक होणार आहे. तसेच सेनेसोबत जाण्यापूर्वी आघाडीची बैठक होणार आहे.
शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपचे प्रयत्न
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊ नयेत म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना चव्हाण यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
मुंबईचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर
नाशिकसोबतच मुंबई महानगर पालिकेचं महापौरपद देखील खुल्या प्रवर्गामध्ये वर्ग करण्यात आलं आहे. मुंबईत याचा फारसा परिणाम जाणवत नसला, तरी नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करणार
काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (दि. १२ नोव्हेंबर) रात्री उशीरा भेट घेऊन काँग्रेस शिवसेनेच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये काम करणार असल्याची खात्री दिली. त्यानंतर आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच शिवसेना संपुर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री पद स्वतःकडेच ठेवणार,असे चित्र दिसत आहे.