नागपूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दारू बनवणार्या एका कंपनीला मेगा प्रोजेक्टचा दर्जा देण्यासाठी कंपनीची 2 जिल्ह्यांतील गुंतवणूक एकत्र दाखवली. तसेच, या कंपनीला सुमारे 210 कोटी रुपयांची सबसिडीदेखील दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
एखाद्या गुंतवणूक कंपनीला मेगा प्रोजेक्टचा दर्जा देण्यासाठी संबंधित कंपनीची एका तालुक्यात किमान 250 कोटींची गुंतवणूक आवश्यक असते. तथापि, या मद्यनिर्मिती कंपनीची दोन जिल्ह्यांत गुंतवणूक आहे. असे असतानाही केवळ कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केवळ 100 दिवसांतच संबंधित कंपनीला मेगा प्रोजेक्टचा दर्जा देत सबसिडीही दिली. मेगा प्रोजेक्टचा फायदा देण्यासाठी कोणत्या नियमाखाली 2 जिल्हे एकत्र करण्यात आले आणि त्यापोटी कंपनीला 200 कोटींचा फायदा देण्यामागे कारण काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.
My Mahanagar Exclusive : मेगा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी उद्योग खात्याने कंपनीला दिला 200 कोटींचा फायदा#MyMahanagar @OfficeofUT @samant_uday @sanjaysawant75 @rautsanjay61 @AUThackeray @_BhaskarJadhav @Subhash_Desai @advanilparab https://t.co/pGnMeVY46S
— My Mahanagar (@mymahanagar) December 27, 2022
अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची 210 कोटींची गुंतवणूक आहे. तसेच याच कंपनीची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात 82 कोटींची गुंतवणूक आहे. मेगा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी अहमदनगर आणि चिपळूण असे दोन तालुकेच नाही तर दोन जिल्हे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी क्लब केले आणि दोन्ही ठिकाणची एकत्रित 292 कोटी रुपयांची गुंतवणूक दाखवून टिळकनगर इंडस्ट्रीचा प्रस्ताव शिंदे सरकारने 2 महिन्यांपूर्वी संमत केला असल्याचे सांगण्यात येते.
बॉम्ब बॉम्ब म्हणणारे लवंगी फटाकाही नाही, फडणवीसांचा ठाकरे गटाला टोला#MyMahanagar @mieknathshinde @Dev_Fadnavis @OfficeofUT @rautsanjay61 https://t.co/sPeDIFSNVI
— My Mahanagar (@mymahanagar) December 27, 2022
नागपूर एनआयटी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्यासाठी देखील सरसावले आहेत.