मुंबईः बाॅलिवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. ही इंडस्ट्री बाहेर जाऊ नये, यासाठी ठोस उपाय योजना केल्या जातील, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
याबाबतचा मुद्दा आमदार वंजारी यांनी उपस्थित केला. मुंबईतील दादासाहेब फाळके इंडस्ट्री बंद करण्याची नोटीस महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जारी केली आहे. त्यामुळे मुंबईतील बाॅलिवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर नेण्याचा हा प्रकार आहे का?, ही इंडस्ट्री पण गुजरातला नेणार का?, असा प्रश्न आमदार वंजारी यांनी विचारला.
यावर मंत्री देसाई म्हणाले, ही इंडस्ट्री बंद करण्यासाठी नेमकी का नोटीस जारी करण्यात आली याची माहिती घेतली जाईल. त्यात काही त्रुटी आहेत का?, काही अडचणी आहेत का?, काही अनियमितता आहे का?, हे तपासले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत याविषयात लक्ष घातले जाईल व ही इंडस्ट्री मुंबईबाहेर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली.
यावेळी आमदार वंजारी व आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये खडाजंगीही झाली. हे सभागृह आहे. तुम्ही येथे मारामारी करणार आहात का?, असे विचारत सभापती निलम गोऱ्हे यांनी आमदार लाड व आमदार वंजारी यांना शांत राहण्याचा सल्ला दिला.
नुकतीच गुजरातची निवडणूक झाली. ही निवडणूक भाजपला जिंकविण्यात महाराष्ट्राचाही हातभार आहे. कारण महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, असा मुद्दा आमदार यांनी वंजारी यांनी उपस्थित केला. त्यावर आमदार लाड हे आक्रमक झाले. त्यामुळे आमदार लाड व आमदार वंजारी यांच्यात वाद झाला. दोघेही आरे तूरेच्या भाषेवर आले. दोघांमध्ये हाणामारी होण्याची परिस्थिती निर्माण झाली. अखेर सभापती निलम गोऱ्हे यांनी यात मध्यस्थी केली. दोघांनाही शांत राहण्याचा सल्ला सभापती गोऱ्हे यांनी दिला.
मात्र महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. आमच्यावर वारंवार आरोप करणे बंद करा. शिंदे-फडणवीस सरकारने रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले आहेत. येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.