राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा फेसबुकवर लाईव्ह येत जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन केले जात असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मी रोज गर्दी करु नका, असे आवाहन करत आहे. ते करोना निगेटिव्ह होण्यासाठी. मात्र आयुष्यात निगेटिव्ह होऊ नका. घरच्यांसोबत वेळ व्यतित करा. वातावरण पॉझिटिव्ह ठेवा. भीतीचे वातावरण आहे, मात्र तुम्ही सरकारने दिलेल्या सूचनांते तंतोतंत पालन केल्यास आपण या संकटातून बाहेर पडू,असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.
पुढचे काही दिवस अंत्यत कसोटीचे आणि परिक्षेचे आहेत. त्यानंतर आपल्याला कोणीही थोपवणार नाही, असे सांगताना ठाकरे म्हणाले की, ज्यांना घरात राहायची सवय नाही. ज्यांचे तळहातावर पोट आहे त्यांच्यासाठी हे अवघड आहे. मात्र करोना विषाणूला थोपविण्यासाठी आपल्याला काही काळ थोडं थांबावच लागेल.
तसेच सरकारने २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे. यावरही त्यांनी भाष्य केले. “गर्दी टाळण्यासाठी २४ तास जीवनावश्यक दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र लोकांची जी झुंबड पाहिली ते बघून मला धक्काच बसला. लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लोकांनी शिस्त दाखवावी.”, असे आवाहन त्यांनी केले.
पोलिसांवर ताण येऊ देऊ नका
पोलिसाच्या एका लहान मुलीचा व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबतही ठाकरे यांनी काळजी व्यक्त केली.पोलिसांचे लहान मुले त्यांना बाहेर जाऊ देत नाही हा व्हिडिओ पाहिला. पोलीस आपल्यासाठी काम करत आहेत. त्यांच्यावर किती ताण टाकायचा. पोलीस फक्त चोरांपासून आपले रक्षण करत नाही. तर डोळ्यांना न दिसणाऱ्या शत्रूपासून देखील आपले रक्षण करत आहेत. सिद्धिविनायक ट्रस्ट पोलिसांसाठी खाद्याची सोय करत आहे, यालाच माणुसकी म्हणतात. यापुढे शिव भोजन केंद्र २ तासांऐवजी ३ तास चालू ठेवणार असल्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरे यांनी सांगितले.