पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिंनाक २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता सोशल मीडियावर लाईव्ह येत देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. २१ दिवस म्हणजेच एप्रिल १४ पर्यंत देशभरात लॉकडाऊन असेल असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज काशीतील नागरिकांना संबोधित करत असताना त्यांनी सांगितले की, महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी १८ दिवस लागले होते, मात्र करोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आपल्याला २१ दिवसांचा काळ द्यायचा आहे.”
काशीतील नागरिकांशी लाईव्हद्वारे बोलताना मोदीजी म्हणाले की, महाभारताच्या युद्धात भगवान श्री कृष्ण सारखे महारथी होते, आज आपल्याकडे १३० कोटी महारथी आहेत. त्यांच्या भरोशावर आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे. लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मोदीजी जाहीर सभा घेत आहेत. करोनाबाधितांना उपचार देणाऱ्या सर्व यंत्रणांचे आणि तेथील कर्माचाऱ्यांचे मोदींनी आभार व्यक्त केले.
काशीचे स्थान देशात वेगळे आहे. काशी शाश्वत, सनातन आणि कालातित आहे. आज लॉकडाऊनच्या परिस्थितीत काशी देशाला संयम, समन्वय, संवेदनशीलता, सहयोग, शांती, सहनशीलता, साधना, सेवा आणि समाधान शिकवू शकते.