देशासह राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढतोय. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ८८ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालीय. त्यामुळे सर्वाधिक राज्यांमध्ये आता खबरदारीचा उपाय घेतला जातोय. केंद्रासह राज्य सरकार नागरिकांनाही वेळीच सावध होण्याच्या सूचना करत आहे. अशातच राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध लागू होणार हे निश्चित झालेय. त्यामुळे या निर्बंधांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यात सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा निर्बंध कसे लागू करायचे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स सदस्यांची एक बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. तसेच आगामी ख्रिसमस, नववर्ष स्वागत या सणांमुळे होणारी गर्दी आणि याचवेळी लग्न समारंभ, पार्टी, हॉटेल्स आणि उपहारगृहांमध्ये होणारी गर्दी यावर निर्बंध कसे लावायचे यावरही विस्तृत चर्चा झाली. यााबतचा निर्णय २४ डिसेंबरला घेत नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत राज्यांनी लावलेल्या निर्बंधांसह, अमेरिका, ब्रिटन, युरोपात वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरही चर्चा झाली. या बैठकीत मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या होत्या.