वाराणसीत उड्डाणपूल कोसळून १८ जणांचा मृत्यू

वाराणसीत उड्डाणपूल कोसळून १८ जणांचा मृत्यू

वाराणसी पूल दुर्घटना

वाराणसी रेल्वे स्थानकाजवळ काम सुरु असलेल्या उड्ड्णपुलाचा काही भाग कोसळून अपघात झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाल्याचे समोर आले आहे. उड्डाणपूल कोसळून १८ जणांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. या उड्डाणपुलाचे दोन खांब कोसळले असून ढिगाऱ्याखाली माणसे अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींसोबतच चार कार, एक रिक्षा आणि एक मिनीबस ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती वाराणसीचे पुनर्वसन आयुक्त संजयकुमार यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी घटना समजल्यानंतर देखील अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेली मदत पथके तब्बल एका तासाने घटनास्थळी दाखल झाल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

उत्तर प्रदेश ब्रिज कन्स्ट्रक्शन हा उड्डाणपूल बांधत असून पुलाचे ५६ टक्के काम पूर्ण झाले होते. तसेच, फेब्रुवारीच्या अखेरीस काही भाग पाडून पुन्हा त्याचे बांधकाम करण्यात आले होते. हा उड्डाणपूल २ हजार २६१ मीटर लांब असून त्याच्या उभारणीकरता तब्बल १२९ कोटी इतका खर्च येणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाराणसी हे शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघात आहे. मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपर्क करुन घटनेची माहिती घेतली. दुर्घटनेच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यांची समिती नियुक्ती केली होती. या समितीने ४८ तासांत चौकशी अहवाल सादर केला.

First Published on: May 16, 2018 6:31 AM
Exit mobile version