जम्मू-काश्मीरमध्ये २८ हजार जवान तैनात; स्थानिक नेत्यांना भरली धडकी

जम्मू-काश्मीरमध्ये २८ हजार जवान तैनात; स्थानिक नेत्यांना भरली धडकी

काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सापडलेले भुसुरुंग आणि रायफेलनंतर सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे २८ हजार जवान काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. केंद्र सरकार आणि लष्कराच्या या निर्णयाने मात्र जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नेत्यांना धडकी भरली आहे. कलम ३५ ‘अ’ रद्द करण्यासाठी जवानांचा फौजफाटा वाढवण्यात आल्याची भीती स्थानिक नेत्यांना वाटत आहे. केंद्र सरकार कलम ३५ ‘अ’ रद्द करण्यासाठी तर हा फौजफाटा लावत नाही ना? असा सवाल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.

हेही वाचा – दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट; अमरनाथ यात्रा रद्द

काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?

ओमर अब्दुल्ला म्हणाले की, ‘काश्मीरमधील सध्याची परिस्थिती बघता लष्कर आणि हवाई दलाला अलर्टवर ठेवण्यात आले आहे? कलम ३५ ‘अ’ रद्द करण्यासाठी तर हा फौजफाटा लावत नाही ना? जर अशाप्रकारचा फौजफाटा लागू करण्यात आला आहे, तर हे काहीतरी वेगळे आहे.’

स्थानिक पक्षांनी बोलावली बैठक

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या स्थानिक पक्षांनी यासंदर्भात रात्री बारा वाजता बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारचा काहीतरी मोठा प्लॅन आखला जात असल्याचा संशय त्यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला. याशिवाय ट्विटमध्ये केंद्र सरकार मुस्लिमबहुल राज्याचे प्रेम जिंकण्यास अयशस्वी ठरल्याचेही मुफ्ती म्हणाल्या.

First Published on: August 2, 2019 9:44 PM
Exit mobile version