देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. देशातील एकूण ११५ जागांसाठी आज मतदान सुरु आहे. दरम्यान, आसाममध्ये ६८ वर्षीय बसीर अली यांनी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. अली हे कॅन्सरग्रस्त आहेत. ते कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर असून मृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र, तरिही त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अली त्यांचे बालपणाचे मित्र मुकूट चौधरी यांच्यासोबत मतदान केंद्रात गेले होते.
‘अली हे लोकशाहीप्रधान देशाच्या मतदाराचं एक मुर्तीमंत उदाहरण आहेत. अली यांना आरामाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अलींना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ते कॅन्सरशी झुंज देत आहेत. तरिही त्यांची मतदान करायची दृढ इच्छा होती. त्यामुळे रिक्षा करुन त्यांना मतदानासाठी मतदान केंद्रावर घेऊन यावं लागलं’, असे अली यांचे मित्र मुकूट चौधरी यांनी सांगितलं.
आज आसाममध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या ४ जागांसाठी मतदान होणार आहे. या ४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गुवाहाटी, बारपेटा, भुबरी, कोकराझार या जागांसाठी मतदान होणार आहेत.