गेल्या वर्षभरापूर्वी मार्च महिन्यात कोरोनाने देशभरात कोरोनाचा कहर करण्यास सुरूवात केली. यादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन देखील करण्यात आला. कोरोनामुळे कित्येक कंपन्यांवर आर्थिक सकंट ओढावल्याने काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला तर काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय दिला. मात्र आता वर्ष उलटून गेले तरी आयटी कंपन्यांसह अनेक कंपन्यांनी सुरू केलेली ही वर्क फ्रॉम होमची पद्धत सुरूच आहे. मात्र पुन्हा एकदा देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना पुन्हा लॉकडाऊन केले जाईल का? पुन्हा आपले जनजीवन विस्कळीत होईल का? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत ८७ टक्के भारतीय उद्योग आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू असलेली पद्धत कायम ठेवण्याचा विचार करत असून त्यांनी याला पसंती दिली असल्याचे समोर आले आहे.
नुकतेच बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि झूम या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमबाबत सर्वेक्षण केले. या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ८७ टक्के भारतीय उद्योग गांभीर्याने विचार करत असल्याचे समोर आले तर वर्क फ्रॉम होम सोबत ऑफिसला न येता ऑफिसबाहेरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तीनपटीने वाढ झाल्याचे या सर्वेक्षणातील अहवालात नोंदवण्यात आले आहे.
बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप अर्थात बीसीजीने केलेले हे सर्वेक्षण भारत, अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स आणि जर्मनी या देशात असणाऱ्या महत्त्वाच्या उद्योग व्यवसायांबद्दलच्या निरीक्षणावर करण्यात आले. यामध्ये असे निदर्शनात आले की, उद्योग- व्यवसायांच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये होणाऱ्या कामासंदर्भात चार ते पाच पटीने वाढ झाली. तर कोरोना महामारीपूर्वीच्या तुलनेत एक तृतीयांशहून अधिक कर्मचाऱ्यांना ऑफिसला न जाता बाहेरून किंवा वर्क फ्रॉम होम करता यावं, असं उद्योग व्यवसायांची इच्छा असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.