लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांचा एकजुटीच्या प्रयत्नांना वेग; नितीशकुमार यांनी राहुल गांधी, खर्गेंची घेतली भेट

लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांचा एकजुटीच्या प्रयत्नांना वेग; नितीशकुमार यांनी राहुल गांधी, खर्गेंची घेतली भेट

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांचा एकजुटीच्या प्रयत्नांना वेग येताना दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी  रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), केसी वेणुगोपाल (KC venugopal), जेडीयू अध्यक्ष लालन सिंह (Lalan singh) आणि बिहार सरकारचे मंत्री संजय झा (Sanjay Jha) हेही उपस्थित होते. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या बैठकीला उपस्थित नसल्याचे समोर येत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये १३५ जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवणार्‍या काँग्रेसने शनिवारी येथे आपली सत्ता स्थापन केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांसोबतच यावेळी आणखी ८ मंत्र्यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांसह 18 विरोधी पक्षांचे नेते एकाच मंचावर दिसले. सर्व नेत्यांनी एकत्र विरोधकांच्या एकजुटीचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

लोकसभा निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि नितीश कुमार गेल्या काही महिन्यांपासून विरोधी एकजुटीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे आणि नितीश कुमार यांनीही अनेक विरोधी नेत्यांची भेट घेत एकत्र येण्यासाठी चर्चा केली आहे. नितीश कुमार यांनी याच महिन्यात ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीयाच्यासह यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे.

रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची रविवारी (21 मे) भेट घेतली. यावेळी नितीश कुमार म्हणाले की, केंद्र सरकार जे काही करत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. जे अधिकार राज्य शासनाला दिले गेले आहेत ते काढून कसे घेतले जाऊ शकतात. असले प्रकार थांबवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. आमचा केजरीवाल यांना पूर्णपणे पाठिंबा आहे.

 

First Published on: May 22, 2023 8:14 PM
Exit mobile version