सरकारी एअर लाईन्स कंपनी एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये ४५ लाख प्रवाशांचा डेटा चोरीला गेला आहे. यामध्ये प्रवाशांची वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. जसे की, प्रवाशांचे नाव, जन्मतारिख, मोबाईल नंबर, पासपोर्टची माहिती, तिकिटची माहिती इत्यादी गोष्टी चोरीला गेल्या आहेत.
एअर इंडियाच्या माहितीनुसार, प्रवाशांच्या डेटा ठेवण्याचे काम सीटा पीएसएस कंपनी करते. या कंपनीच्या सिस्टममधून ४५ लाख प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. २६ ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान प्रवास केलेल्या प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. यामध्ये प्रवाशांचे नाव, जन्म तारीख, मोबाईन नंबर, पासपोर्ट नंबर, क्रेडिट कार्ड या सर्वांचा समावेश आहे. पण प्रवाशांच्या सीवीवी आणि सीवीसीची माहिती सुरक्षित असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर तातडीने कंपनीने चौकशीचे आदेश दिले आहेत. क्रेडिट कार्ड धारकांना संपर्क केला गेला आहे आणि त्यांना याबाबत सांगितले आहे. शिवाय एअर इंडियाच्या एफएफपी प्रोग्रामचा पासवर्ड रिसेट केला गेला आहे. डेटा सुरक्षित राहण्याकरता कंपनीने प्रवाशांना पासवर्ड बदलण्यास सांगितले आहे.
याबाबत एअर इंडिया कंपनी म्हणाली की, सध्या कार्यवाही सुरू आहे. यादरम्यान आम्ही प्रवाशांचा पासवर्ड बदलण्याच्या प्रयत्नात आहोत. प्रवाशांची खासगी माहिती सुरक्षित ठेवणे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.