देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी बुधवारी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी सांगितले की, कोविडच्या परिस्थितीवर केंद्रीय बँक लक्ष ठेवून आहे. ते असेही म्हणाले की, जगाच्या तुलनेत भारतातील रिकव्हरी रेट जगापेक्षा वेगवान आहे, परंतु कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी RBI कडून आरोग्य क्षेत्राला ५० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
RBI announces Rs 50,000 crore liquidity for ramping up COVID-related healthcare infrastructure and services till March 2022: Governor Shaktikanta Das pic.twitter.com/PjBoEJVTsE
— ANI (@ANI) May 5, 2021
दरम्यान आरबीआय गव्हर्नर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. तसेच कोरोनाच्या दुसर्या लाटेवर मात करण्यासाठी बँकांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत रूग्णालय, ऑक्सिजन पुरवठा करणारे, लस आयात करणारे, कोविड औषधांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे. यासह रिझर्व्ह बँकेने केवायसीवर मोठी सूट दिली असून व्हिडिओ केवायसी आणि नाॉन फेस टू फेस टू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्राधान्य देण्यास सांगितले आहे. तसेच बँकांना कोविड लोन बुक बनविण्याच्या सूचना तसेच प्राधान्याने प्रायोरिटी सेक्टरसाठी इन्सेन्टिव्ह देण्याची घोषणाही केली आहे. आरबीआयने २५ कोटी रूपये कर्ज घेणाऱ्या वैयक्तिक, लहान कर्जदारांना कर्जाची पुनर्रचना करण्याची दुसरी संधी दिली आहे.
सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असून देश या संकटाशी सामना करत आहे. मंगळवारी अवघ्या एका दिवसात ३ लाख ८२ हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद केली गेली, जे सोमवारच्या तुलनेत जवळपास २८ हजार रुग्णांपेक्षा अधिक आहेत. तर चिंताजनक म्हणजे देशातील कोरोना बाधितांनी २ कोटींचा आकडा ओलांडला असून गेल्या १५ दिवसांत ५० लाखाहून अधिकांना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे.