देशातील अनेक राज्यात आज भाजपा कार्यकर्ते ४१ वर्धापन दिन साजरा करत आहेत. याचदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना मोदींनी CAA आणि कृषी कायद्याच्या मुद्द्याला हात घालत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी मोदी म्हणाले की, काहींसाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे योजना आणि मते मिळण्याचे माध्यम बनले आहे, त्यामुळे याविषयाला राजकीय वळण मिळत आहे. परंतु विरोधक याला कम्युनल बोलतात. आजकाल चुकीच्या पद्धतीने गोष्टी समोर आणल्या जातात. CAA कायदा, कृषी कायदा आणि कामगार कायद्याविरोधातही लोकांना भडकवण्यात आले. यामागे विचारपूर्वक राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. भाजपा संविधानात बदल करतोय, नागरिकता काढून घेतोय, शेतकऱ्यांची जमीन लुटतोय असा विरोधकांचा आरोप आहे. आपला पराजय न स्वीकारणारे भाजपाचे शत्रुच अशाप्रकारची कामे करु शकतात. त्यामुळे भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सावध राहणे गरजेचे आहे असे म्हणत विरोधकांवर खरमरीत ठीका केली.
भाजपाच्या ४१ वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींपासून ते अटल बिहारी वाजपेयी यांनी भाजपाला योग्य मार्गावर आणले. तसेच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी सारख्या नेत्यांनी भाजपाला पुढे आणले. अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मताच्या फरकाने भाजपा सरकारचा पराभव मान्य केला. परंतु पक्षाच्या आदर्शासह तडजोड केली नाही. आमच्यासाठी व्यक्तीपेक्षा दल मोठा आहे तर दलापेक्षा देश मोठा आहे. देशात राजकीय स्वार्थापोटी दल तुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु भाजपामध्ये असे झाले नाही. आपातकालीन परिस्थिती भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले, भारतीय संविधानातील कलम ३७० रद्द करत आपण काश्मीरला संविधानिक अधिकार देऊ शकलो. असेही ते म्हणाले.
कोरोनाविषयी बोलताना मोदी म्हणाले, गेल्या वर्षी कोरोना संसर्गाने देशासमोर मोठे संकट उभे केले. त्यावेळी सुख, दु:ख विसरत देशाच्या सेवासाठी भाजपा कार्यकर्ते पुढे आले. यावेळी सेवा हेच संघटन असा संकल्प करत भाजपा कार्यकर्ते लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले लोकांची सेवा करत राहिले. गावोगावी जात घराघरात पोहचत भाजपाने आपले दायित्व केले. गरीब कल्याण योजनेपासून वंदे भारत मिशनपर्यंत भाजपाचे कार्य लोकांनी पाहिले. एवढेच नाही तर या संकटात देशवासियांनी नव्या भारताच्या दिशेने वाटचाल केली. यातून आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात केली. आज आत्मनिर्भर भारत अभियान गाव गरीब, युवा, मजुर, शेतकरी, दलित, वंचित, माहिलांचे तसेच स्वत:चे एक अभियान बनले आहे. भाजपा जगातील सर्वात मोठी पक्ष आहे, याचा अर्थ भाजपा देशहित जपणारा पक्ष आहे. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.