पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून भाजपाचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून भाजपाचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा

कोलकाता : रामनवमीनिमित्त हावडा येथे गुरुवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार झाला होता. त्यावरून हुगळीचे भाजपा खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी, पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या जीवाला धोका आहे, असे वक्तव्य केले. दर रामनवमीला आणि दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी अशा घटना समोर येतात. हे निराशाजनक आहे. बंगालमधील हिंदूंच्या जीवाला धोका असणे, हे मान्य नाही, असे त्या म्हणाल्या.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर लांगुलचालनाचे राजकारण केल्याचा आरोप करत खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी 30 तास धरणे आंदोलन केले,  त्यावेळी ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या? रमझानच्या काळात मुस्लीम चांगले राहतात! हे त्याचेच उदाहरण आहे का? व्होट बँक आणि लांगुलचालनाच्या राजकारणासाठी त्या समाजकंटकांना वाचवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था गंभीर आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यायला हवा. मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री अशा घटना रोखण्यास असमर्थ आहेत. एकामागून एक घटना घडत आहेत. या सर्वांची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करावी. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही बंगालमधील हिंसाचाराचा निषेध केला आहे, असे त्यांनी नमूद केले.

कव्हरेजसाठी पोहोचलेल्या एका राष्ट्रीय वाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करण्यात आली होती, त्यासंदर्भात त्या म्हणाल्या, ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत पत्रकारांवर हल्ले झाले, रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक झाली. पत्रकार हिंसाचाराचे बळी ठरत आहेत आणि राज्य सरकार मूकपणे सर्व पाहात आहे. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? अस सवाल त्यांनी केला.

First Published on: March 31, 2023 10:55 PM
Exit mobile version