कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. देशातील कोरोना परिस्थिती भयावह झाली होती. कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे देशपातळीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासला होता. अशा परिस्थितीमध्ये अनेक रुग्ण ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दगावली होती परंतु केंद्र सरकारने ऑक्सिजनमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची स्पष्ट भूमिका राज्यसभेत मांडली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी ३०९५ मेट्रिक टन एवढी वाढली तर दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची मागणी ९००० मेट्रिक टन एवढी वाढली होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा झाला होता. राज्यांनी ऑक्सिजनची मागणी केल्यानंतर त्या त्या राज्यांना अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. आरोग्य हा राज्य सरकारचा विषय असून राज्य सरकार नियमित कोरोनाबाधितांची नोंद आणि मृत्यूच्या आकड्याची नोंद करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तसेच राज्यांत ऑक्सिजनची कमतरता, बेडची कमतरता भासल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला का या प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर दिलंय, भारती पवार यांनी म्हटलं आहे की, आरोग्य हा राज्याचा विषय आहे. राज्य सरकार कोरोनाबाधितांच्या आकडेवारीची नियमित नोंद करत आहेत.
दरम्यान आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. राज्यातील कोरोनाबाधितांची नोंद आणि मृत्यूची संख्या नोंदवण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार सर्व राज्य सरकार नोंदणी करुन माहिती पुरवत आहेत. त्यानुसार कोणत्याही राज्यात ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली नाही आहे.
भारती पवार यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ३०९५ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ९००० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढली होती. राज्य सरकारला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने दुसऱ्या राज्यांशी करार करुन ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला होता.