सरकारनं आख्खी एअर इंडिया विकायला काढली! १०० टक्के शेअर विक्रीला!

सरकारनं आख्खी एअर इंडिया विकायला काढली! १०० टक्के शेअर विक्रीला!

एअर इंडिया

सरकारी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाला गेल्या काही वर्षांपासून नुकसानाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८मध्ये देखील अशाच प्रकारे एअर इंडियामधील शेअर्स विकायला काढले होते. मात्र, तेव्हा सरकारने फक्त ७६ टक्के शेअर्स विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण हे शेअर्स खरेदी करण्यासाठी कुणीही खरेदीदार पुढे आला नाही. अखेर पुन्हा एकदा सरकारने एअर इंडिया विकण्यासाठी पुढाकार घेतला असून यावेळी मात्र केंद्र सरकारने एअर इंडियाचे सर्वच्या सर्व म्हणजे १०० टक्के शेअर्स विक्रीसाठी काढले आहेत. हे शेअर्स खरेदी करण्यासाठी खरेदीदारांना येत्या १७ मार्चपर्यंत आपले प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवायचे आहेत. त्यावर ३१ मार्चला केंद्र सरकार खरेदीदारांना अंतिम निर्णय कळवेल, असं या संदर्भात केंद्र सरकारकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

एअर इंडियाला हजारो कोटींचा तोटा

गेल्या दशकभराचा विचार केला, तर एअर इंडियाचा नुकसानीचा आकडा तब्बल ६९ हजीर ५७५ कोटींच्या घरात जातो. खुद्द हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीच ही माहिती डिसेंबर २०१९मध्ये संसदेला दिली आहे. प्रवासी संख्येचा विचार करता एअर इंडियाने २०१८ या वर्षात १ कोटी ७६ लाख प्रवाशांची ने-आण केली होती. तर २०१९मध्ये हा आकडा वाढून १ कोटी ८३ लाख झाला होता. मात्र, तरीदेखील एअर इंडिया तोट्यात चालत असल्यामुळे सरकारने १०० टक्के शेअर विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तोट्यात चालत असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे घबराट आहे. मुळात आधीच तोट्यात चालत असलेल्या कंपनीला पुन्हा खरेदीदार मिळाले नाहीत, तर आपल्या रोजगाराचं काय होणार? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना सतावतो आहे.


हेही वाचा – एका वर्षात एअर इंडियाला ८,४०० कोटी रुपयांचा तोटा
First Published on: January 27, 2020 12:14 PM
Exit mobile version